तीन लाख हेक्टरवरील सोयाबीन भुईसपाट
By Admin | Updated: October 6, 2014 23:18 IST2014-10-06T23:18:46+5:302014-10-06T23:18:46+5:30
पावसाची दडी, विविध किडींचा प्रकोप आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतच सोयाबीनची पानगळ अशा स्थितीत जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरवरील सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे.

तीन लाख हेक्टरवरील सोयाबीन भुईसपाट
पावसाची दडी : भारनियमनाने ओलितावर फेरले पाणी
यवतमाळ : पावसाची दडी, विविध किडींचा प्रकोप आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतच सोयाबीनची पानगळ अशा स्थितीत जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरवरील सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे. या परिस्थितीतून वाचण्यासाठी शेतकरी ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन यावरही पाणी फेरत आहे.
निसर्ग प्रकोप शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. काल-पर्वापर्यंत हिरवे दिसणारे शेतशिवार उन्हाच्या तडाख्याने करपले आहे. सुरुवातीपासूनच पावसाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे. मृग आणि रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. उशिरा आलेल्या पावसाने पेरणी उशिरा झाली. सर्वाधिक फटका बसला तो सोयाबीनला. जिल्ह्यात तीन लाख एक हजार ७११ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. मात्र पावसाचा लपंडाव सुरूच होता. सोयाबीन फुलोऱ्यावर असताना पावसाने पाठ फिरविली. परतीचा पाऊसही बरसला नाही. त्यामुळे आधीच कुपोषित असलेले पीक रोगाला बळी पडले. बुरशीजन्य रोगांचे प्रारंभी आक्रमण झाले. त्यानंतर मोझॅकने कहर केला. हिवरीगार दिसणारी पाने पिवळी पडू लागली. त्यातच उंट अळीचाही प्रकोप सुरू झाला. शेंगा हिरव्या अवस्थेत असतानाच सोयाबीनची पानगळ झाली. सोयाबीनच्या झाडाला पाने नाही आणि अपरिपक्व शेंगा दिसत आहे. अशा स्थितीत अपुऱ्या पाण्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरवरील सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे.
निसर्गाच्या लहरीपणासोबतच वीज वितरणाचा मनमानी कारभारही शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. सध्या कृषी फिडरवर २२ तासाचे भारनियमन होत आहे. केवळ दोन तास वीज उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे. (शहर वार्ताहर)