आश्वासक पावसाने पेरणी सुरू

By Admin | Updated: June 20, 2016 02:10 IST2016-06-20T02:10:07+5:302016-06-20T02:10:07+5:30

जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळताच शेतकऱ्याचे शिवार आनंदाने न्हावून निघाले असून या आश्वासक पावसाने जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू झाली.

Sowing starts with supportive rain | आश्वासक पावसाने पेरणी सुरू

आश्वासक पावसाने पेरणी सुरू

जिल्ह्यात ३२ मिमी पाऊस : शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य
यवतमाळ : जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळताच शेतकऱ्याचे शिवार आनंदाने न्हावून निघाले असून या आश्वासक पावसाने जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू झाली. शनिवारी रात्री जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस कोसळला. मान्सून सक्रिय झाल्याने आता हमखास पाऊस बरसणार याची खात्री झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.
सुरुवातीला हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवित मान्सून वेळेवर येण्याचे भाकित केले होते. मात्र हवामानातील बदलाने मान्सूनची गती मंदावली. परिणामी रोहिणीतील अवकाळी पावसानंतर अर्धे मृग नक्षत्र कोरडे गेले होते. धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली होती. हवामान खातेही दररोज वेगवेगळा अंदाज वर्तवित होते. अशातच शनिवारी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. हवामान खात्यानेही हा मान्सूनचा पाऊस असल्याचे शिक्कामोर्तब केले. जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस बरसला. सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात नोंदविला गेला. जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस झाला असून आतापर्यंत ७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दमदार पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी रविवारी पेरणीची लगबग सुरू केली. कपाशी, सोयाबीन, मूग, तूर, उडीद आदी पिकांची लागवड केली जात आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पावसाने नदी, नाले खळखळून वाहू लागले आहे. जलस्रोतात वाढ झाली असून पाणीटंचाईलाही काही अंशी दिलासा मिळाला आहे. तसेच नागरिकांची असह्य उकाड्यापासून सुटका झाली.
लांबलेल्या पावसाने नऊ लाख हेक्टरवरील पेरणी खोळंबली होती. तर ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली ते शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. शनिवारच्या पावसाने धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र काही भागात झालेल्या जोरदार पावसाने बियाणे दडपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु काही का असे ना या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे. येत्या काही दिवसात शेतात शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न फुलणार हे तेवढेच खरे. (शहर वार्ताहर)

सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात ८५ मिमी

यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सरासरी ३२ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात ८५ मिमी कोसळला. यवतमाळ २८ मिमी, बाभूळगाव २२ मिमी, कळंब १२ मिमी, दारव्हा २७ मिमी, दिग्रस ५४ मिमी, नेर ३० मिमी, पुसद ५४ मिमी, महागाव ७४ मिमी, उमरखेड ४२ मिमी, केळापूर १४ मिमी, राळेगाव ९ मिमी, घाटंजी ५७ मिमी, मारेगाव ८ मिमी आणि झरी तालुक्यात ४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Web Title: Sowing starts with supportive rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.