ग्रामीण भागात घोंगावतोय डिझेल पंपांचा आवाज
By Admin | Updated: October 1, 2014 23:30 IST2014-10-01T23:30:21+5:302014-10-01T23:30:21+5:30
वाढते भारनियमन आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने शेतकरी वैतागून गेला असून तळपत्या उन्हात पिकांना वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा स्थितीत शेता-शेतात डिझेल

ग्रामीण भागात घोंगावतोय डिझेल पंपांचा आवाज
पुसद : वाढते भारनियमन आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने शेतकरी वैतागून गेला असून तळपत्या उन्हात पिकांना वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा स्थितीत शेता-शेतात डिझेल इंजीनचा आवाज घुमत असून शेतकऱ्यांना मात्र मोठा आर्थिक फटका बसत आहे.
यंदा मान्सूनच्या आगमनापासून पाऊस अनियमित होता. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांंना काही प्रमाणात संजीवनी मिळाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. नंतर पूर्ण महिना कोरडा गेला आहे. शेतातील पिके आता मान टाकू लागले आहे. भारनियमनाचा अतिरेक यात आणखी भर घालीत आहे. सोयाबीन, कापूस, तूर ही पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. मात्र वाढत्या भारनियमनाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ऐन सोयाबीन व कापसाला पाण्याची वेळ असताना वीज टंचाईने कळस गाठला आहे. शेतकऱ्यांनी आता ओलितासाठी डिझेल इंजीनचा आधार घेतला आहे. ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात डिझेल इंजीनचा वापर केला जायचा. मात्र विद्युत पंपाने त्याची जागा घेतली. परंतु आता भारनियमनाने पुन्हा डिझेल पंपाचाच आधार घ्यावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना सर्वप्रथम डिझेल इंजीनच खरेदी करण्याची वेळ येते. एका इंजीनची किंमत १५ ते ३५ हजारापर्यंत आहे.
वीज टंचाईमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात इंजीनची खरेदी करीत आहे. पैसे नसतानाही उधार, उसनवार करून शेतकरी डिझेल इंजीन खरेदी करीत आहे. या डिझेल इंजीनला दररोज ८०० ते हजार रुपयांचे डिझेल लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशा स्थितीत शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. आधीच पिकांवर किडींनी आक्रमण केले आहे. ही कीड नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. अपेक्षित उत्पादनाची अपेक्षा मावळली आहे. परंतु शेतात दिसणारे पीक तर जगवावेच लागणार. मोठ्या आशेने शेतकरी ओलिताची व्यवस्था करीत आहे. ज्यांची डिझेल इंजीन घेण्याची क्षमता नाही, असे शेतकरी रात्री-बेरात्री जाऊन ओलित करताना दिसत आहे. एकंदरित पिकांना वाचविण्याची धडपड शेतकरी करीत असला तरी वीज वितरण कंपनी मात्र आपल्या धोरणात बदल करायला दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)