पीक विम्याच्या २४० कोटींचे लवकरच वितरण
By Admin | Updated: July 31, 2015 00:14 IST2015-07-31T00:14:39+5:302015-07-31T00:14:39+5:30
तब्बल महिनाभरापूर्वी पीकविमा कंपनीने राज्यात १६०० कोटींचा विमा मंजूर केला. त्यापैकी १३६० कोटी रुपये विविध बँकांकडे वळते करण्यात आले.

पीक विम्याच्या २४० कोटींचे लवकरच वितरण
बँकांकडे रक्कम वळती : कंपनीच्या दिरंगाईचा १९ हजार शेतकऱ्यांना फटका
यवतमाळ : तब्बल महिनाभरापूर्वी पीकविमा कंपनीने राज्यात १६०० कोटींचा विमा मंजूर केला. त्यापैकी १३६० कोटी रुपये विविध बँकांकडे वळते करण्यात आले. तर उर्वरित २४० कोटींचा निधीही शुक्रवारी २४ जुलै रोजी बँकांकडे वळता करण्यात आला. लवकरच या रकमेचे शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे.
दरम्यान, पीकविम्याच्या एकूण रकमेपैकी २४० कोटी अडकल्याची माहिती विमा कंपनीने बँकांपासूनही दडवून ठेवली होती. त्यामुळे बँकांही अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब झाला. या विलंबाचा फटका राज्यभरातील एक लाख, तर यवतमाळ जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांना बसला.
राज्यातील शेतकऱ्यांना १६०० कोटी रूपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला होता. यामधून जिल्ह्यासाठी ७८ कोटी ८९ लाख ४८ हजार १३८ रूपये मंजूर झाले. हा निधी जिल्ह्याकडे वळता झाला. जिल्हा बँकेने वाटपाची प्रक्रिया सुरू केली. मात्र १९ राष्ट्रीयकृत बँकांनी वाटप थांबविले होते. पीकविम्याची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नसल्याचे कारण बँकांनी पुढे केले. या गोंधळाने पात्र शेतकऱ्यांना संकटकाळात मदतीपासून वंचित राहावे लागले. पीकविम्याची रक्कम वाटपाच्या प्रक्रियेला जिल्हा बँकांनी प्रारंभ केला. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांमधून शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
यातून जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राष्ट्रीय कृषी पीकविम्याच्या १६०० कोटींपैकी १३६० कोटी वितरित करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यासाठी ७८ कोटी ८९ लाख ४८ हजार १३८ रूपये मंजूर करण्यात आले. याचा फायदा जिल्ह्यातील एक लाख २२ हजार ४५७ शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये सर्वाधिक ६३ कोटी रूपयांचा पीकविमा जिल्हा बँकेच्या सदस्यांना मंजूर झाला आहे.
तर १५ कोटींचा विमा राष्ट्रीयकृत बँकेच्या सदस्यांना मंजूर झाला आहे. यासाठी २०१४-१५ मध्ये शेतकऱ्यांनी नऊ कोटी ६७ लाख १२ हजार ६०० रूपये भरले होते. विमा मदतीस पात्र असताना या शेतकऱ्यांना मंजूर रक्कम मिळाली नाही. यामुळे शेतकरी संतप्त आहेत. (शहर वार्ताहर)