जिल्ह्यात जलयुक्त शिवाराचे सामाजिक सर्वेक्षण
By Admin | Updated: May 23, 2015 23:55 IST2015-05-23T23:55:13+5:302015-05-23T23:55:13+5:30
जलयुक्त शिवार योजनेच्या महत्त्वाकांक्षी कामाला जिल्ह्यात प्रारंभ झाला. यात कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी ..

जिल्ह्यात जलयुक्त शिवाराचे सामाजिक सर्वेक्षण
१६ पथकांची करणार निर्मिती : पारदर्शकतेसाठी जिल्ह्यात पहिला प्रयोग, जिल्हाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
यवतमाळ : जलयुक्त शिवार योजनेच्या महत्त्वाकांक्षी कामाला जिल्ह्यात प्रारंभ झाला. यात कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रत्येक कामात पारदर्शकता आणली जात आहे. कामाच्या पाहणीकरिता सामाजिक सर्वेक्षण केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर, तालुक्यातील कामाची विरूध्द तपासणी वरिष्ठ अधिकारी करणार आहे. याबाबत अधिकाऱ्यांच्या याद्या सादर
करण्याचे निर्देश
जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत दिले.
जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील ४१३ गावांची निवड करण्यात आली आहे. यातील काही गावांमध्ये कामांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेत मोठया प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. या कामात पारदर्शकता आणण्यासाठी नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सामाजिक सर्वेक्षणाचा विचार मांडून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली आहे. याकरिता १६ भरारी पथकांची निर्मिती करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जेसीबीधारकांची उपविभागीय अधिकारीस्तरावर बैठक घेऊन कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. सिमेंट नालाबांध असणाऱ्या ठिकाणी प्रामुख्याने खोली वाढविण्याच्या सूचना आहेत. निवड करण्यात आलेले ठिकाण चुकीचे असल्यास अशी कामे रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, रोहयोचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपविभागीय अधिकारी माने, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यासोेबतच विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
(शहर वार्ताहर)
अभियांत्रिकी, कृषी प्राध्यापक करणार सर्वेक्षण
सामाजिक सर्वेक्षणासाठी अभियांत्रिकी (सिव्हील), कृषी, आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राध्यापकांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी यवतमाळ शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांची बैठक बोलाविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जलयुक्त शिवार योजनेतील कामे दर्जेदार झाले की, नाही याची विरुध्द तपासणी केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील बांधकाम आणि जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या याद्या मागविण्यात आल्या. सध्या झालेली कामे योग्य आहेत का, हे तपासण्यासाठी विरूध्द तालुक्यातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्त अधिकाऱ्यांना या कामाचा अहवाल प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे.