शासकीय आकडेवारीवर संशय
By Admin | Updated: July 13, 2015 00:06 IST2015-07-13T00:06:47+5:302015-07-13T00:06:47+5:30
शिक्षण विभागाने एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला. मुळात शिक्षकांनी सादर केलेली आकडेवारीच फसवी आहे.

शासकीय आकडेवारीवर संशय
खासगी संस्थेचे स्वतंत्र सर्वेक्षण : शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध
सुरेंद्र राऊत यवतमाळ
शिक्षण विभागाने एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला. मुळात शिक्षकांनी सादर केलेली आकडेवारीच फसवी आहे. अनेकांनी सर्वेक्षणाचे काम सहज घेत सुटीसारखी मौज केली. याचा पुरावा झरी, घाटंजी तालुक्यात झालेल्या एका खासगी सर्वेक्षणाने पुढे आणला आहे.
अनेक गावांत शाळाबाह्य मुले असतानाही शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात ती दाखविण्यातच आली नाहीत. त्यामुळेच ही माहिती सपशेल खोटी ठरली आहे. झरी तालुक्यातील पाचपोर या गावात आठ मुले शाळाबाह्य आढळली. हे तर सहजच दिसणारे उदाहरण आहे; प्रत्येक पोडावर अशी शाळाबाह्य मुले आहेत. मात्र, त्यांचा शोधच घेतला गेला नसल्याने सर्व्हे म्हणजे एक शासकीय सोपस्कार ठरला.
शासनाच्या कोणत्याही योजनेचा आराखडा तयार करण्यापूर्वी सर्वेक्षण होते, त्यात वास्तवाशी कोणताही संबंध दिसत नाही. त्यामुळे कोट्यवधीच्या योजना राबवूनही त्याचे फलित दिसत नाही. अशीच स्थिती शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचीही आहे. या अभियानावर एका दिवशी लाखो रुपये खर्च होऊनही प्रत्यक्ष कोणताच डाटा हाती आला नाही. अनेक शिक्षकांनी आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी चक्क खोटी माहिती सादर केल्याचे दिसून येते.
सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात झरी तालुक्यातील पाचपोर येथे किरण सुनेराव कुुमरे, प्रतिमा वासुदेव मडावी, नकुल शंकर आत्राम, काजल वसंता आत्राम, साजना वंसता सोयाम, उषा तुळशीराम आत्राम, कार्ती राजू मेश्राम, भारती राजू मेश्राम, घाटंजी तालुक्यातील दत्तपूर या आश्रमशाळा असलेल्या गावात दीपक सखाराम राठोड, यश सिडाम, योगेश गेडाम, रायसा येथे वैभव पुजमले, कोली येथील कुंदन किनाके, यवतमाळ तालुक्यातील चिंचबर्डी येथे विशाल पेंदोर, विशाल आत्राम, बंसी घोडाम, सागर रामगडे, संजन मुकझडे, नेर तालुक्यातील कामनदेव येथे शुभम आडे, शुभम राठोड ही मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. केवळ शासनाच्या सर्वेक्षणातील फोलपणा उघड करण्यासाठी काही ठराविक गावात जाऊन साधी विचारपूस केल्यानंतर हे वास्तव बाहेर आले. प्रत्यक्षात शासनाने पुन्हा सर्वेक्षण करण्याची गरज आहे. यातूनच शाळाबाह्य मुलांचा खरा आकडा समोर येण्याची शक्यता आहे. शाळाबाह्य मुलांचा ४ जुलै रोजी केलेला सर्व्हे हा केवळ धूळफेक करणार ठरला आहे.
‘युवा वेध’ने शोधली मुले
शासनाच्या सर्वेक्षणातील फोलपणा उघड करण्यासाठी युवा वेध मंच या सामाजिक संस्थेने झरी तालुक्यातील पाचपोर, घाटंजी तालुक्यातील दत्तपूर, यवतमाळ तालुक्यातील चिंचबर्डी, नेर तालुक्यातील कामनदेव येथे भेट दिली. तेथे अनेक शाळाबाह्य मुले आढळून आली. पण त्यांची नोंद शासकीय सर्वेक्षणात झाली नाही. त्यामुळे ही शाळाबाह्य मुले सर्व्हेबाह्यदेखील ठरली आहेत.