तरुणाचे अपहरण करणारे सहा अटकेत
By Admin | Updated: May 18, 2015 02:15 IST2015-05-18T02:15:35+5:302015-05-18T02:15:35+5:30
जुन्या व्यवहारातील एक लाख रुपयांसाठी तालुक्यातील कलगाव येथील एका तरुणाचे अपहरण करून पश्चिम महाराष्ट्रात...

तरुणाचे अपहरण करणारे सहा अटकेत
दिग्रस : जुन्या व्यवहारातील एक लाख रुपयांसाठी तालुक्यातील कलगाव येथील एका तरुणाचे अपहरण करून पश्चिम महाराष्ट्रात घेऊन जाणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून अपहृत तरुणाची सुखरुप सुटका करून सहा अपहरणकर्त्यांना दिग्रस पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहरणकर्त्यांशी झालेल्या झटापटीत एक पोलीस शिपाई जखमी झाला. पोलिसांनी रिव्हॉल्वर, चाकू आणि वाहन जप्त केले आहे.
दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील म.जलील या तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. यासंदर्भात त्याच्या पत्नीने दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दिग्रस पोलिसांनी शनिवारी एक पथक तयार केले. मोबाईल लोकेशनवरून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा संग्रामपूर ते जालना दरम्यान सदर वाहन असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी रात्री ११ वाजतापासून २ वाजेपर्यंत या वाहनाचा पाठलाग केला. अपहृत तरुणाला काही होऊ नये म्हणून काळजी घेत अपहरणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी अपहरणकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीत पोलीस शिपाई मोहसीन शेख जखमी झाला. तर इतर पोलिसांनाही जबर मार लागला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी आशिष ईर्फ राहूल रामभाऊ वारे (२३) रा. फुलेनगर पाथरडी, राहुल बापूराव तुपे (२१) रा. बाभूळगाव ता. पाथरडी, केतन साहेबराव खाडे (२०) रा. साईबाबानगर ता. पाथरडी, हनुमान विजय परदेशी (२४) रा. साईबाबानगर, भूजंग संपतराव गर्जे (३५) रा. अकोला ता. पाथरडी, रामदास भानुदास आंधळे (३५) रा. जिल्हेवाडी जि. अहमदनगर यांना पोलिसांनी अटक केली.
या आरोपींना पकडण्यासाठी ठाणेदार संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक काँक्रेटवार, नारायण पवार, गजानन पत्रे, मोहसीन शेख, राजू पवार यांनी कारवाई केली. दिग्रस पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)