फौजदारासह सहा पोलीस निलंबित
By Admin | Updated: May 12, 2016 02:36 IST2016-05-12T02:36:15+5:302016-05-12T02:36:15+5:30
येथील कुख्यात गुंड प्रवीण दिवटे याला रुग्णालयीन उपचारादरम्यान स्पेशल ट्रिटमेंट देणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांना

फौजदारासह सहा पोलीस निलंबित
आरोपी दिवटेला ‘स्पेशल ट्रिटमेंट’ भोवली : खासगी वाहन, हॉटेलात मुक्काम
यवतमाळ : येथील कुख्यात गुंड प्रवीण दिवटे याला रुग्णालयीन उपचारादरम्यान स्पेशल ट्रिटमेंट देणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. त्यात एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे.
निलंबितांमध्ये फौजदार के.के. सिंग, सहायक फौजदार वाघमारे, पोलीस कर्मचारी निर्मल राठोड, प्रफुल्ल फुलकर, पोलीस चालक विजय पारडकर आणि शरद शिवणकर यांचा समावेश आहे. बुधवारी या सहा पोलिसांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. येथील गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या प्रवीण दिवटे जिल्हा कारागृहात बंदीस्त आहे. न्यायाधीन बंदी असताना ५ मे २०१६ रोजी त्याला वैद्यकीय उपचाराकरिता जे.जे. रुग्णालय मुंबई येथे दाखल करण्यात आले. त्याकरिता भायखळा जिल्हा कारागृह येथे मार्गस्थ बंदी म्हणून त्याला वरिष्ठांनी परवानगी दिली होती. त्याला मुंबईला नेण्याकरिता शासकीय वाहन आणि स्ट्राँग गार्ड उपलब्ध करून देण्यात आले. परंतु प्रवासादरम्यान दिवटेला शासकीय वाहनाऐवजी खासगी वाहनात बसण्याची सवलत देण्यात आली. यवतमाळ ते मुंबई हा सलग प्रवास करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी पोलीस वाहनावर दोन चालक दिले गेले होते. मात्र त्यानंतरही दिवटेला खासगी हॉटेलात मुक्कामी ठेवले गेले. तो पुण्यात १६ ते १७ तास मुक्कामी होता. त्याबाबत नियंत्रण कक्षाला अथवा संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली गेली नाही.
सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी दिवटेची हातमिळवणी करून त्याची सरबराई केल्याचे व सोईसुविधा पुरविल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने फौजदारासह सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले. पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणे, कर्तव्यात निष्काळजीपणा, दिरंगाई, कसुरी केल्याचा ठपका या सहा पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
राजकीय आश्रयाने गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भडका उडण्याची चिन्हे
यवतमाळ शहरात दोन प्रमुख गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. एका टोळीला सत्ताधारी पक्षाचा तर दुसऱ्या टोळीला विरोधी पक्षाचा वरदहस्त आहे. त्या बळावरच या टोळ्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. पोलीस ठाण्यांचे डीबी पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि अधिकाऱ्यांची बोटचेपी भूमिका या टोळ्यांचे वर्चस्व वाढण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. प्रशासनच आक्रमक नसल्याने कनिष्ठ यंत्रणा या टोळ्यांशी जुळवून घेत आपले हितसंबंध जोपासत आहेत. राज्यात सत्ता परिवर्तन होताच यवतमाळात भाईगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भाईगिरीला राजकीय स्तरावरून खतपाणी घातले जात असल्याने पोलिसांचाही अनेकदा नाईलाज होताना पहायला मिळते. हा राजकीय वरदहस्त असाच कायम राहिल्यास आणि पोलिसांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे न बजावल्यास नजीकच्या भविष्यात यवतमाळात गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भडका उडण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.