सीतादईने कापूस वेचणीला सुरुवात
By Admin | Updated: October 9, 2015 00:29 IST2015-10-09T00:29:08+5:302015-10-09T00:29:08+5:30
यावर्षी पावसाचा अनियमितपणा, विजेचा लपंडाव, रोगांचा प्रादुर्भाव या संकटाला धैर्याने तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगविले.

सीतादईने कापूस वेचणीला सुरुवात
हिवरी : यावर्षी पावसाचा अनियमितपणा, विजेचा लपंडाव, रोगांचा प्रादुर्भाव या संकटाला धैर्याने तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जगविले. आता सीतादई करून शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला प्रारंभ केला आहे.
शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणजे कापूस. केंद्र व राज्य सरकारने कापसाला अत्यल्प भाव दिला असला तरी शेतकऱ्यांनी कामातील उत्साह सोडविला नाही. कापूस पीक आता फुलू लागले आहे. सीतादई करून वेचणीला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. पेरणीपासून कापूस फुटेपर्यंत शेतकऱ्यांनी जीवापाड पीक जपले. कापसासारखे नगदी पीक घरी आणताना शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या उत्साहाला धार्मिकतेची जोडही मिळते. सीतादई केल्याशिवाय वेचणीला प्रारंभ केला जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा शेतकरी आजही पाळत आहे. अनेक ठिकाणी पऱ्हाटीला बोंड फुटू लागले आहे. ही सुगीची चाहुल शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरली आहे.
सीतादईचा विधी अनेक शेतांमध्ये सध्या दिसून येत आहे. अत्यल्प भाव, नैसर्गिक संकटे यांचा सामना करीत दरवर्षी कापसाचे पीक घेतले जात आहे. वेचणीला प्रारंभ झाला असला तरी पणन महासंघाचे भाव मात्र अत्यल्प आहे. ते भाव शासनाने वाढवावे, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. सोयाबीनवर आतापर्यंत झालेला खर्चही निघण्याची शक्यता कमी आहे.
यावर्षी जिल्ह्यात कापसाचा ६० टक्के पेरा आहे. परंतु बाजारभाव पाहता कापूस विकताना तो सावकाराला द्यावा की सरकारला विकावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावणार आहे. योग्य भाव मिळाल्यास शेतकऱ्यांची फरफट थांबणार आहे. कापूस पणन महासंघाने अद्यापही शासकीय खरेदीची तारीख निश्चित केलेली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. पणन महासंघाने वेळकाढू धोरण बाजूला ठेऊन खरेदीची तारीख जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)