सोळाही तहसीलदारांना कारणे दाखवा
By Admin | Updated: May 17, 2015 00:27 IST2015-05-17T00:27:33+5:302015-05-17T00:27:33+5:30
खरडीचा मोबदला वितरणात हयगय केल्याप्रकरणी जिल्ह्यातील सर्व सोळाही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस ...

सोळाही तहसीलदारांना कारणे दाखवा
साडेनऊ कोटींची मदत : खरडीचा मोबदला वितरणात हयगय
यवतमाळ : खरडीचा मोबदला वितरणात हयगय केल्याप्रकरणी जिल्ह्यातील सर्व सोळाही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. २४ तासात उत्तर सादर करण्याचे आदेश बजावण्यात आले आहे.
सन २०१३ मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत चार हजार ५४५ हेक्टरवरची शेतजमिन खरडून गेली होती. खरडीचा प्रकोप इतका भयंकर होता, जमिनीतील दगडच याठिकाणी शिल्लक राहिले. यामुळे भविष्यात याठिकाणी शेती पिकणार नाही, अशी स्थिती आहे. यासाठी राज्य शासनाने त्यावेळी हेक्टर २५ हजारांची मदत देण्याची घोषणा केली होती. ही मदत तब्बल दोन वर्षानंतर वितरित करण्याचे आदेश धडकले. यासाठी नऊ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याकडे वळता झाला. महिन्यापूर्वीच तहसीलदारांच्या खात्यात निधी जमा झाला. मात्र यादी नसल्याचे कारण पुढे करत शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा झाला नाही. याबाबत तहसीलदारांनी उपाययोजनाही केल्या नाही. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी याचा जाब विचारला होता. यावेळी तीन दिवसात विषय निकाली काढण्याच्या सूचना होत्या. शनिवारी तीन दिवस पूर्ण झाले. परंतु कुणाचाही अहवाल शासनाला मिळाला नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाने सोळाही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचे उत्तर २४ तासात मागविले आहे.
या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली आहे. नवीन जिल्हाधिकारी रुजू होणार आहे. अशा स्थितीत नव्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे तहसीलदारांना आपला निष्काळजीपणाचे कारण सादर करावे लागणार आहे. नवीन जिल्हाधिकारी या प्रकरणात काय भूमिका घेतात यावर निधी वाटपाची प्रक्रिया अवलंबून राहणार आहे. हा निधी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यास त्यांना पेरणीसाठी याचा मोठा हातभार लागणार आहे. (शहर वार्ताहर)