विमा योजनेला अल्प प्रतिसाद
By Admin | Updated: August 7, 2014 00:05 IST2014-08-07T00:05:24+5:302014-08-07T00:05:24+5:30
शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेचा लाभ व्हावा, या हेतूने शासनाच्या कृषी विभागाकडून सन २०१४-१५ साठी खरीप पीक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले.

विमा योजनेला अल्प प्रतिसाद
मारेगाव : शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेचा लाभ व्हावा, या हेतूने शासनाच्या कृषी विभागाकडून सन २०१४-१५ साठी खरीप पीक विमा काढण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. मात्र मागील हंगामातील पीक विम्याचा वाईट अनुभव आल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी या योजनेस फारसा प्रतिसाद दिलाच नाही़
मागील सन २०१३-१४ च्या खरीप हंगामात तालुक्यातील बिगर कर्जदार चार हजार ८१२ शेतकऱ्यांनी चार हजार १९६ हेक्टर क्षेत्रातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी तब्बल १६ लाख ६३ हजार ४३० रूपयांच्या विमा हप्त्याची रक्कम बँकात जमा करून पीक विम्याचा लाभासाठी संरक्षित केले होते़ त्यात सर्वाधिक क्षेत्र कापूस, सोयाबीन व तुरीचे होते़ मागील हंगामात अतिवृष्टी, गारपिट, संततधार पावसाने खरीप पिकांचे उत्पादन घटले होते. सोयाबीन कापणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसाने सोयाबिनची नासाडी झाली होती. परिणामी एकरी उत्पादन घटले, सोबतच सोयाबीन काळे पडले होते. त्यातच सोयाबिनला भाव सुध्दा कमी मिळाला.
तालुका कृषी कार्यालय व महसूल विभागने मागीलवर्षी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांचे केवळ सांत्वन केले़ खरीप पिकांची आणेवारी ५० टक्केच्या आत आल्याने शेतकऱ्यांना कापूस नाही तर किमान सोयाबीन, तूर पिकाला विम्याचा लाभ मिळेलच, अशी अपेक्षा होती़ तथापि तालुक्यात सर्वात कमी पेरा असणाऱ्या एकमेव ज्वारीलाच पीक विमा मंजूर झाला़ त्यात कुंभा, मार्डी, मारेगाव, वनोजा, बोटोणी या पाचही महसूल मंडळातील मोजक्या गावातील केवळ २६४ शेतकऱ्यांना १२९़५५ हेक्टर क्षेत्रासाठी १० लाख ४५ हजार १३० रूपये मंजूर झाले अन् शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला़ मात्र या अन्यायाविरुद्ध कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला नाही, हे विशेष़
आता यावर्षी नव्याने सन २०१४-१५ साठी प्रथम हवामानावर आधारित नाविन्यपूर्ण पीक विमा आणि नंतर राष्ट्रीय कृषी पीक विमा काढण्याचे शासन निर्देशाप्रमाणे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले़ मात्र आधीच पीक विमा योजनेबाबत संतापलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेला तालुक्यात फारसा प्रतिसाद दिलाच नाही़
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्थ मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यकांना गावागावांत जाऊन, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहित केले़ तथापि त्यांना अल्प प्रतिसाद मिळाला.
तालुक्यातील अल्पभूधारक व इतर अशा केवळ एक हजार १४६ शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारीचे एक हजार ७२ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यासाठी केवळ सात लाख ३२ हजार ६१७ रूपयांचा विमा हप्ता बँकात भरला आहे. तथापि मागील वर्षात कपाशी व सोयाबिनला पीक विमा का मिळाला नाही, कुणाची चूक झाली, याचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. मागीलवर्षी लाभ न झाल्याने यावर्षी उदासीनता दिसून आलाी. (तालुका प्रतिनिधी)