धडक सिंचन विहिरी रखडल्या, हिरवे स्वप्न भंग
By Admin | Updated: May 24, 2014 23:59 IST2014-05-24T23:59:35+5:302014-05-24T23:59:35+5:30
शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेजअंतर्गत धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरी रखडल्या आहेत.

धडक सिंचन विहिरी रखडल्या, हिरवे स्वप्न भंग
वणी : शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेजअंतर्गत धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरी रखडल्या आहेत. परिणामी शेतकर्यांचे हिरवे स्वप्नच करपत आहे. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्हय़ात सतत शेतकरी आत्महत्या होत आहे. त्यासाठी कोरडवाहू शेती कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्याने या पाचही जिल्हय़ात कोरडवाहू शेती केली जाते. ही शेती केवळ निसर्गाच्या पावसावर अवलंबून असते. मात्र लहरी पावसामुळे कोरडवाहू शेती बिनभरवशाची झाली आहे. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओल्या दुष्काळामुळेही या पाचही जिल्हय़ातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कोरडवाहू शेतीमुळे शेतकरी आत्महत्या होत असल्याचा निष्कर्ष काढून शासनाने शेतकर्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. पाचही आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्यांकरिता विशेष पॅकेज देण्यात आले. या पॅकेजच्या माध्यमातून कोट्यवधींच्या योजना तयार करण्यात आल्या. त्यात विविध योजनांसाठी भरीव अनुदानाची तरतूद करण्यात आली. मात्र या योजनांचा लाभ अद्यापही प्रत्यक्षात अनेक शेतकर्यांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे अजूनही जिल्हय़ात शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही. शासनाने कोरडवाहू शेतीवर मात करून शेतकर्यांना सिंचन सुविधा निर्माण करून देण्यासाठी याच पॅकेज अंतर्गत धडक सिंचन विहिरींची योजना आखली. यात अल्प, अत्यल्प आणि अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकर्यांना १00 टक्के अनुदानावर विहिरी बांधून देण्याचा निर्णय घेतला. त्याव्दारे ओलिताची सुविधा निर्माण होईल, असा कयास होता. परिणामी लहान शेतकर्यांचे उत्पन्न वाढून कुणावरही आत्महत्येसारखा प्रसंग ओढवणार नाही, अशी अपेक्षा होती. शासनाचा हेतू अत्यंत चांगला होता. मात्र योजना राबविताना आता सर्वांंची प्रचंड दमछाक होत आहे. वणी तालुक्यात तालुका कृषी विभागातर्फे धडक सिंचन विहिरी योजनेतून तब्बल १९३ शेतकर्यांना विहीर मंजूर झाली होती. त्यापैकी आजमितीस केवळ १३ विहिरींचे काम पूर्ण झाले. सात विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित १७३ विहिरींचे काम अद्याप अपूर्णच आहे. विहिरींचे काम रखडण्यास शासनासोबतच संबंधित शेतकरीही जबाबदार दिसून येत आहे. शासन आणि शेतकरी या दोघांनीही शेतात विहिरी खोदकामासाठी आवश्यक तो पुढाकार घेतलाच नाही. शेतात विहिरी खोदकामासाठी जोमाने प्रयत्न न झाल्याने तालुक्यातील १७३ शेतकर्यांच्या शेतात अद्याप विहीर पूर्ण झालीच नाही. अनेकांनी तर अजूनही विहिरीचे खोदकामच सुरू केले नसावे. त्यामुळे ही धडक सिंचन विहिरी योजनाच आता वांद्यात सापडली आहे. त्यातील अटींमुळे शेतकरीही चांगलेच त्रस्त झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)