शिवकाळात एकही शेतकरी आत्महत्या नाही
By Admin | Updated: February 15, 2016 02:43 IST2016-02-15T02:43:13+5:302016-02-15T02:43:13+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांंना जगण्याचं बळ दिले. त्यामुळे शिवकाळात एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही.

शिवकाळात एकही शेतकरी आत्महत्या नाही
पुसद : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांंना जगण्याचं बळ दिले. त्यामुळे शिवकाळात एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही. हा आदर्श राज्यकर्त्यांनी घेण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन पंकज रणदिवे यांनी येथे केले.
छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्यावतीने येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित शिवपर्वात शनिवारी द्वितीय पुष्प गुंफताना ‘छत्रपती शिवराय- आजच्या युवकांपुढील आव्हाने व उपाय’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. भानुप्रकाश कदम होते. पंकज रणदिवे म्हणाले, महाराष्ट्राची माती ही विरांना जन्म देणारी आहे. जगातील अनेक राष्ट्रांनी शिवरायांचा आदर्श जोपासला. छत्रपतींनी वतनदारी पद्धती बंद करून वेतनदारी पद्धती सुरू केली. शिवनिती डोळ्यांसमोर ठेऊन व्हिएतनाम सारख्या छोट्याशा राष्ट्राने अमेरिकेएवढ्या बलाढ्य राष्ट्राचा तब्बल सात वेळा हरविले. छत्रपतींनी रयतेसाठी आदर्श धोरण ठरविले व त्याची अंमलबजावणी केली. म्हणूनच जाणता राजा अशी नोंद इतिहासाने घेतली. शिवरायांनी समाजातील सर्व क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला. शिवरायांचा आदर जीवनात उतरविल्यास खऱ्या अर्थाने प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. अकील मेमन, प्रा. संजय खुपासे, यशवंतराव चौधरी, इंदल राठोड, बाबाराव उबाळे, हरिभाऊ ठाकरे उपस्थित होते. संचालन चंद्रकांत ढेंगे यांनी तर आभार सुनील ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश पानपट्टे, कार्याध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे, शेखर नादरे, शशांक गावंडे, किशोर पानपट्टे, शरद दुधाने, सुशील वानखेडे, ज्ञानेश्वर बांडे, कैलास भोसले, प्रकाश बेंद्रे, प्रा. बाळासाहेब पौळ, गजानन सुरोशे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)