नेरमध्ये अपघाताची मालिका
By Admin | Updated: March 12, 2015 02:23 IST2015-03-12T02:23:06+5:302015-03-12T02:23:06+5:30
मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांचे आठवडाभरात दोन बळी ठरले.

नेरमध्ये अपघाताची मालिका
नेर : मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांचे आठवडाभरात दोन बळी ठरले. शिवाय सहा जनावरांनाही या वाहनांनी चिरडले. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. पोलीस विभागाकडून मात्र भरधाव धावणाऱ्या वाहनांवर थोडेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. केवळ शहरातच वाहतूक नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी असल्यागत ते वागत आहेत.
तालुक्याच्या लासिना येथे अंगणात उभ्या असलेल्या अभय सोनोने (२५) या युवकाला कंटेनरने चिरडले. या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव नियंत्रणात येत नाही तोच टेंबी येथील दुचाकीवर स्वार माया टोम्पे हिचा कंटेनरच्या धडकेत बळी गेला. अपघातानंतर वाहनधारक पसार होत असल्याने बहुतांश प्रकरणात अपघातग्रस्त वाहन सापडत नसल्याने भरधाव वाहनचालकांची हिम्मत वाढली आहे.
लासिना येथे घडलेल्या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त ट्रकचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी चालकाने कुठेही न थांबता वाहनाचा वेग वाढविला, याप्रकारात सहा जनावरांचा बळी गेला. अखेर ट्रक नेर येथे पकडून चालकाला ताब्यात घेण्यात आले.
टेंबी येथे महिलेला धडक देऊन पसार झालेला ट्रक पकडण्यात नागरिक आणि पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने होणारी वाढ नागरिकांच्या जीवावर उठली आहे.
नेर शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक शिपायांची नियुक्ती आहे. मात्र ते आपले कार्यक्षेत्र काही भागापूरतेच मर्यादित ठेवत आहेत. वर्दळीच्या परिसरात तेवढी त्यांची कामगिरी दिसते. इतर ठिकाणी मात्र वाहतुकीवर नियंत्रण नाही. त्यामुळे शहरात लहानमोठे अपघात ही बाब नित्याची झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थिनी सुसाट वाहनाची बळी ठरली होती. हा प्रकार थांबविणे पोलीस
विभागासाठी आव्हान ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)