कर्जासाठी बँकांचे कार्यक्षेत्र निश्चित
By Admin | Updated: May 27, 2015 02:20 IST2015-05-27T02:20:51+5:302015-05-27T02:20:51+5:30
बँकेच्या व्यवस्थापकांकडून शेतकऱ्यांना पीककर्जासाठी टोलवाटोलवी केली जात होती. तुमचे गाव आमच्या कार्यक्षेत्रा नाही असे सांगून बाहेर काढले जात होते.

कर्जासाठी बँकांचे कार्यक्षेत्र निश्चित
यवतमाळ : बँकेच्या व्यवस्थापकांकडून शेतकऱ्यांना पीककर्जासाठी टोलवाटोलवी केली जात होती. तुमचे गाव आमच्या कार्यक्षेत्रा नाही असे सांगून बाहेर काढले जात होते. हा प्रकार टाळण्यासाठी आता २३८ बँक शाखांच्या कार्यक्षेत्रातील गावांची यादीच जाहीर केली जाणार आहे. प्रत्येक बँक व्यवस्थापकाला ही यादी आपल्या शाखेत दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पीककर्ज वाटपच्या उद्दिष्टापैकी केवळ ४९ टक्के कर्ज वाटप झाले. अनेक थकीत शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे रुपांतरण करण्यात आले नाही. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात बँक व्यवस्थापकाकडून केली जाणारी मुजोरी मोडीत काढण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी थेट रुद्रावतार धारण करून शनिवारी झालेल्या बैठकीत सर्वच शाखा व्यवस्थापकांना निर्वाणीचा इशारा दिला. कर्ज वाटपात हयगय केल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. यापूर्वी जिल्हा बँकर समितीसमोरच आढावा होत होता. मात्र पहिल्यांदाच थेट सर्व बँक शाखा व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली. त्यात कर्ज प्रकरण घेऊन आलेल्या शेतकऱ्या सन्मानाने वागणूक देण्यास सांगितले.
बँकांच्या शाखेचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे आणि अग्रणी बँक प्रबंधक जी.जी. पिंपळे यांच्यावर जबाबदारी सोपविली. जिल्ह्यातील २०५० महसुली गावे २३८ बँक शाखांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ठ केले जाणार आहे. एका बँक शाखेच्या कार्यक्षेत्रात नऊ गावे येणार आहेत. जिल्ह्यात १३२ राष्ट्रीयकृत व खासगी बँकेच्या शाखा आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ८२ शाखा, ग्रामीण बँकेच्या २४ शाखा आहेत. यामधून सुरळीत कर्ज वाटप होण्यासाठी शाखांचे कार्यक्षेत्र निश्चित करून गावांची यादी जाहीर होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)