वाटखेड शाळेचा कारभार केवळ दोन शिक्षकांवर
By Admin | Updated: August 22, 2014 00:09 IST2014-08-22T00:09:58+5:302014-08-22T00:09:58+5:30
परिसरात येत असलेल्या वाटखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा कारभार दोन शिक्षकांवर सुरू आहे. पाच तुकड्यांसाठी येथे दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

वाटखेड शाळेचा कारभार केवळ दोन शिक्षकांवर
हिवरी : परिसरात येत असलेल्या वाटखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा कारभार दोन शिक्षकांवर सुरू आहे. पाच तुकड्यांसाठी येथे दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.
वाटखेड शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत तुकड्या आहे. एकूण शाळेची पटसंख्या ही ४८ इतकी आहे. या तुकड्यांसाठी चार शिक्षकांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र येथील जागा अनेक दिवसांपासून रिक्त आहे. १०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या या गावाकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. दोन शिक्षक, पाच तुकड्या शिकविण्यासाठी चांगलीच कसरत करतात.
एकाच खोलीत दोन वर्ग आणि एक वर्ग वऱ्हांड्यात बसून मधोमध शिक्षकाचे अध्यापन कार्य चालते. पटसंख्या कमी असली तरी वेगवेगळ्या तुकड्यातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिकवणे शक्य होत नाही. सुरू असलेला पाठ हा पाचवीचा आहे की दुसरीचा असा गोंधळ विद्यार्थ्यांचा होतो. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनाचा पाया समजल्या जातो.
या वयात आत्मसात केलेले ज्ञान आणि रुजलेल्या संकल्पना जीवनभर उपयोगी पडतात. त्यामुळेच राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जातात. वाटखेड येथे मात्र दुर्दैवाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. या बाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी आणि निवेदने दिली.
त्यानंतरही येथे शिक्षक देण्यात आला नाही. अजून किती दिवस दोन शिक्षकांच्या भरोशावर या शाळेचा गाडा चालणार असा प्रश्न आहे. शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये ११ विद्यार्थी, इयत्ता दुसरी ९, इयत्ता तिसरी १२, इयत्ता चौथी ९, इयत्ता पाचवी ७ विद्यार्थी आहे.
आता जिल्हापरिषद प्रशासनाने तातडीने शिक्षक दिला नाही तर ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिक्षकाविना विद्यार्थ्यांचे अद्यापनच खोळंबले आहे. (वार्ताहर)