शुभारंभालाच बियाणांचा तुटवडा
By Admin | Updated: June 13, 2016 01:02 IST2016-06-13T01:02:22+5:302016-06-13T01:02:22+5:30
पावसाच्या तुरळक सरी बरसताच बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे.

शुभारंभालाच बियाणांचा तुटवडा
कपाशी एक हजारावर : खतांच्या किमती वाढण्याचा कांगावा
यवतमाळ : पावसाच्या तुरळक सरी बरसताच बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. शुभारंभालाच कपाशीच्या एका वानाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. या बियाणाची बॅग एक हजार रुपयांवर पोहोचली आहे. शिवाय खताच्या किमती वाढण्याचा कांगावा विक्रेत्यांकडून केला जात आहे.
जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर बियाणे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात बियाणे बाजारात आणले आहे. यासोबतच नवा फंडा वापरला जात आहे. यात कापसाच्या वानाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. या वाणाची ८०० रुपयांची बॅग चक्क एक हजार ते १ हजार २०० रुपयात विकली जात आहे. यासाठी मार्जीन निश्चित करण्यात आली आहे. खत आणि इतर बियाणे खरेदी करणाऱ्यांनाच या बियाण्यची बॅग दिली जात आहे. विशेष म्हणजे गुणवत्ता नियंत्रण पथक यापासून बेखबर आहे. याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बियाणाची बॅग अधिक दराने विकली जात असताना विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही. यामुळे विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. यातून अधिक दराने कपाशी बियाणे विकण्याची जणू स्पर्धा लागल्याचे चित्र बियाणे बाजारात आहे. (शहर वार्ताहर)
दुष्काळावर मात करण्यासाठी बियाणांचे दर कमी केले
दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने बियाणांच्या किमती ३० रुपयांनी कमी केल्या आहेत. तसे परिपत्रक काढण्यात आले असले तरी, काही खासगी कंपन्यांनी आपली मक्तेदारी कायम ठेवत अतिरिक्त दर शेतकऱ्यांवर लादले आहेत. अशा कंपन्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही.