सोयाबीनवर अधरवेलीचे जाळे
By Admin | Updated: September 17, 2014 00:02 IST2014-09-17T00:02:24+5:302014-09-17T00:02:24+5:30
सोयाबीनवर विविध किडींनी आक्रमण केले असताना आता त्यात अधरवेलीचीही भर पडली आहे. परपोशित या अधरवेलीने बाभूळगाव तालुक्यातील सोयाबीनवर अधरवेलीचे जाळे पसरले आहे.

सोयाबीनवर अधरवेलीचे जाळे
बाभूळगाव : सोयाबीनवर विविध किडींनी आक्रमण केले असताना आता त्यात अधरवेलीचीही भर पडली आहे. परपोशित या अधरवेलीने बाभूळगाव तालुक्यातील सोयाबीनवर अधरवेलीचे जाळे पसरले आहे. यावर कोणतेही प्रतिबंधात्मक औषधी नाही. त्यामुळे अधरवेलीच्या विळख्यातील सोयाबीन नष्ट केल्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातून बचावलेले पीक बहरत आले असताना विविध किडींनी आक्रमण केले. मोझॅकसह इतर किडींमुळे पिकांचे नुकसान होत आहे. अशातच बाभूळगाव तालुक्यातील सोयाबीनच्या पिकावर अधरवेलीने आक्रमण केले आहे. गणोरी ते उमरी मार्गावर प्रकाशचंद छाजेड यांचे शेत आहे. या शेतात त्यांनी १२ एकर क्षेत्रात सोयाबीन व तुरीची लागवड केली. सद्यस्थितीत सोयाबीनला ८० ते १०० शेंगा आहेत. तूरही चांगली बहरत आली आहे. मात्र या सोयाबीनवर अमरवेलीने आपले जाळे पसरविले आहे. या वेलीने अनेक झाडे विळख्यात घेतली असून शेकडो झाडे वाळत आहे. औषधाची फवारणी करूनही ही वेल मरत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकाशचंद छाजेड यांनी तर कृषी विभागाचा सल्ला घेतला. मात्र यावर कोणतेच औषध निघाले नसल्याचे सांगण्यात आले. तर इतर शेतकऱ्यांनी अधरवेल असलेली झाडे नष्ट करण्याचा सल्ला दिला. मात्र १०० ते ८० शेंगा असलेले सोयाबीनची झाडे नष्ट करताना शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. (प्रतिनिधी)