समृद्धीला ग्रामपंचायतींचीच आडकाठी
By Admin | Updated: August 1, 2015 03:43 IST2015-08-01T03:43:12+5:302015-08-01T03:43:12+5:30
येथील पंचायत समितीतर्फे तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरण संतुलित समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली.

समृद्धीला ग्रामपंचायतींचीच आडकाठी
सुशील निकोडे वणी
येथील पंचायत समितीतर्फे तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरण संतुलित समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र या योजनेला ११ ग्रामपंचायतींनीच आडकाठी निर्माण केली. केवळ दोन ग्रामपंचायती या योजनेत पात्र ठरल्या आहे. या १३ ग्रामपंचायतींनी योजनेवर १३ लाख ५१ हजार १३१ रूपयांचा निधी खर्च केला आहे.
राज्य शासनातर्फे पंचायत समितीमार्फत सन २०११-१२ या वर्षांत तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये समृद्धी ग्राम योजना राबविण्यात आली. त्यात तालुक्यातील अहेरी, कुंभारखणी, शेलू (बु.), कोलगाव (साखरा), मारेगाव (कोरंबी), वडगाव (टीप), पठारपूर, लालगुडा, लाठी, तरोडा, शेवाळा, चिखली व टाकळी या ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. मात्र चिखली व टाकळी या दोनच ग्रामपंचायतीने तिनही वर्षांचे निकष पूर्ण केले आहे. त्यामुळे चिखली व टाकळी या दोनच ग्रामपंचायती समृद्धी योजनेस पूर्णपणे पात्र ठरल्या आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींना शासनातर्फे रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. उर्वरित ११ ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण न केल्याने त्या पुरस्कारापासून वंचित राहणार आहे.
सन २०११-१२ मध्ये गावात ५० टक्के झाडे लावणे, झाडांना संरक्षण गार्ड लावणे, गावात ६० टक्के शौचालयांचे बांधकाम करणे, ६० टक्के कर वसुली करणे, गावात प्लॉस्टिक वापरावर बंदी आणणे, प्लॅस्टीक पिशव्यांची विल्हेवाट लावणे, गावात पर्यावरणपूरक मूर्ती बनवून तिचे विसर्जन करणे, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेणे, यशवंत पंचायत राजमध्ये ५० टक्के सहभाग घेणे आदी निकष प्रथम वर्षासाठी होते. हे निकष तालुक्यातील १३ ही ग्रामपंचायतींनी प्रथम वर्षी पूर्णपणे पार पाडले.
दुसऱ्या वर्षात सन २०१२-१३ मध्ये ७५ टक्के झाडे लावणे, ७० टक्के शौचालय बांधणे, ८० टक्के कर वसुली करणे, गाव प्लॅस्टीकमुक्त करणे, प्लॅस्टीक पिशव्यांची प्रत्यक्ष विल्हेवाट लावणे व प्रत्यक्ष मातीची मूर्ती बनवून ती विसर्जीत करणे, १०० टक्के घनकचऱ्याचे नियोजन करणे आदी निकष पूर्ण करावयाचे होते. मात्र तालुक्यातील अहेरी, कुंभारखणी, शेलू (बु.), कोलगाव (साखरा), मारेगाव (कोरंबी), वडगाव (टीप), पठारपूर, लालगुडा, लाठी, तरोडा, शेवाळा या ग्रामपंचायतींनी निकष पूर्ण न केल्यामुळे त्या या योजनेतून बाद झाल्या. केवळ चिखली व टाकळी या दोनच ग्रमपंचायत्तींनी हे निकष पूर्ण केले आहे.
त्यानंतर सन २०१३-१४ मध्ये या दोन्ही ग्रामपंचायतींनी तिसऱ्या वर्षातील अगदी कठीण निकषही पूर्ण केले आहे. आता ही दोनही गावे समृद्धी ग्राम योजनेसाठी पात्र ठरली आहेत. तसेच हे दोन्ही गाव आता आदर्श ग्राम बनण्याच्या वाटेवर आहे. या दोन्ही गावांत १०० टक्के झाडे लावण्यात आली. तब्बल ८० टक्के ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम केले. गावात प्लॅस्टिकचा वापर कायमस्वरूपी टाळण्यात आला.
स्वच्छता अभियान १०० टक्के राबविले. गावात ५० टक्के खताची निर्मिती केली. ही सर्व कामे या ग्रामपंचायतींनी पूर्ण केली. त्यामुळे त्या पुरस्कारास पात्र ठरल्या आहेत. उर्वरित ११ ग्रामपंचायतींनी या योजनेचे निकळच पूर्ण केले नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा निधी व्यर्थ गेल्याचे दिसत आहे.