पाच हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी
By Admin | Updated: August 7, 2014 00:04 IST2014-08-07T00:04:52+5:302014-08-07T00:04:52+5:30
तालुक्यात यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांची स्थिती वाईट आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची पाळी आली आहे. याही परिस्थितीत शेतात

पाच हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी
मुकेश इंगोले - दारव्हा
तालुक्यात यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांची स्थिती वाईट आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची पाळी आली आहे. याही परिस्थितीत शेतात लागवड केली. कशीबशी पिकेही उभी राहिली. परंतु आता मात्र वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दारव्हा तालुक्यातील पाच हजारांपेक्षा जास्त क्षेत्रावरील उभे पीक वन्य प्राण्यांनी फस्त केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या वनपरिक्षेत्रात दोन हजार दोनशे ४० हेक्टर खासगी शेतजमीन वनजमिनीला लागून आहे. सध्या जंगलात चारा व पिण्याचे पाणी नसल्याने वन्यप्राणी शेतात घुसतात व त्यामधील पिके उद्ध्वस्त करतात. शेतातील पीक वन्यप्राण्यांनी खाल्ल्याच्या असंख्य तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत.
यावर्षी तालुक्याला सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिली आहे. मान्सूनच्या आगमनानंतर १६ व १७ जूनला बऱ्यापैकी पाऊस झाला. या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. जुलै महिन्यात दोनदा काही दिवस पावसाने झड लावली. परंतु दमदार पाऊस झालाच नाही. आॅगस्टमध्येसुद्धा अशीच स्थिती आहे. आतापर्यंत तालुक्यात
फक्त २८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पाऊस कमी प्रमाणात पडल्याचा दुष्परिणाम शेतातील पिकांवर झाला. परंतु शेतकऱ्यांनी मात्र न डगमगता अशाही परिस्थितीत शेतात पेरणी केली. ड्रिप, स्प्रिंकलरच नव्हे तर चक्क गुंडाने, ग्लासने पाणी टाकून पिके जगविली. परंतु आता मात्र पिकांना वन्यप्राण्यापासून कसे वाचवावे, या काळजीत शेतकरी आहेत. कारण जंगलात प्राण्यांना खायला चारा नाही. कमी पावसामुळे पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे प्राणी मोठ्या प्रमाणात शेतांकडे धाव घेत आहे.
रोही, रानडुक्कर, काळवीट, हरिण या प्राण्यांची कळपच्या कळप शेतात घुसतात व रात्रीतून संपूर्ण शेत फस्त करतात. शेतकरी दिवसा पिकांची राखन करतात. परंतु पावसाळा असल्यामुळे रात्रीला शेतात थांबणे शक्य नाही आणि रात्री जागल केली तरी अनेकदा अंधारात वन्यप्राणी दिसतही नाही. ज्यांची परिस्थिती आहे अशांनी शेताला कुंपन केले. परंतु कुंपनाचे बजेट मोठे असल्याने ते अनेकांना शक्य होत नाही. फुबगाव, नखेगाव, कुंड, पाथ्रड, किन्ही वळगी, शिंदी, करजगाव, महागाव, रामगाव, धनगरवाडी, बोदेगाव, सांगवी, तोरनाळा, खोपडी यासह अनेक गावातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी करण्यात येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शासनाने वनजमिनीला तार कुंपन करून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त लावावा आणि नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.