आरटीओ दलालावर गुन्हा
By Admin | Updated: December 20, 2015 02:34 IST2015-12-20T02:34:18+5:302015-12-20T02:34:18+5:30
वाहनधारकांच्या सुविधेसाठी तालुकास्तरावर सुरू झालेल्या आरटीओ कॅम्पलाही दलालांनी ग्रासल्याचे आता सिद्ध झाले आहे.

आरटीओ दलालावर गुन्हा
राळेगावात कॅम्प : जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देताच तालुका प्रशासन हादरले
राळेगाव : वाहनधारकांच्या सुविधेसाठी तालुकास्तरावर सुरू झालेल्या आरटीओ कॅम्पलाही दलालांनी ग्रासल्याचे आता सिद्ध झाले आहे. राळेगाव येथे शनिवारी आयोजित कॅम्पमध्ये एका वाहनधारकाकडून अधिकची रक्कम उकळणाऱ्या दलालावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी या कॅम्पला भेट दिल्याने झालेल्या हालचालीनंतर ही कारवाई झाली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीचे व्हावे याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तालुका पातळीवर कॅम्प घेण्यात येत आहे. यवतमाळ कार्यालयाप्रमाणेच तालुका पातळीवरील कॅम्पमध्येही दलालांची चलती असल्याच्या बाबी अनेकदा पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे दलालांमार्फत आलेल्या प्रकरणांना आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही अडविले जात नव्हते. कॅम्प बाहेरच दलालांनी आपला ठिय्या मांडला होता. शासकीय शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेवून नागरिकांची आर्थिक लूट केली जात होती. या बाबीच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत झाल्या. शनिवारी येथे आयोजित बैठकीनिमित्त जिल्हाधिकारी दाखल झाले होते. सायंकाळी ५ वाजता त्यांनी आरटीओ कॅम्पला भेट दिली. यावेळी मोटर वाहन निरीक्षक साजन शेंडे यांच्याकडे त्यांनी चौकशी केली. दलालांविषयी माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, साजन शेंडे यांनी एका दलालाचा भ्रमणध्वनी क्रमांकही विनाविलंब दिला. यावरून त्यांचे दलालांशी लागेबांधे असल्याचे स्पष्ट झाले. तेथूनच खऱ्या अर्थाने दलालांविरोधात कारवाईला सुरुवात झाली.
दरम्यान, कळंब येथील रवींद्र हरिभाऊ भोयर या वाहनधारकाने पोलिसात तक्रार दिली. महंमद फारूख महंमद मुश्ताक (यवतमाळ) या दलालाने आपल्याकडून ३०० रुपये आणि कागदपत्र घेतले. पावती मात्र केवळ ६० रुपयांची देण्यात आली, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले. यावरून महंमद फारूख याच्याविरुद्ध राळेगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या आवारात आरटीओ कॅम्प घेतला जात आहे. प्रत्येकवेळी दलालांची चलती राहिली आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने शनिवारी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. यापूर्वीही दलालांच्या कारवाया आणि आरटीओ विभागाकडून मिळणारे पाठबळ या बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. (प्रतिनिधी)