पिंपळगाव-रानवड रस्ता ठरतो जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:13+5:30
या रस्त्याने पायदळ जाणे म्हणजे जीवघेणे ठरते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. राळेगाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वाढोणाबाजार येथे जाणारा हा एकमेव रस्ता आहे.

पिंपळगाव-रानवड रस्ता ठरतो जीवघेणा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाढोणाबाजार : पांदण रस्त्यालाही लाजवेल असा रानवड-पिंपळगाव रस्ता आहे. दुचाकी, चारचाकी वाहने तर दूर बैलगाडीही या मार्गाने काढणे मोठे कठीण काम झाले आहे. या रस्त्याने पायदळ जाणे म्हणजे जीवघेणे ठरते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. राळेगाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वाढोणाबाजार येथे जाणारा हा एकमेव रस्ता आहे.
सन २००८-०९ मध्ये या रस्त्याचे मातीकाम करण्यात आले. पुढे कुणीही या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष दिले नाही. गेली दहा वर्षांपासून या भागातील लोकांना अतिशय दयनीय अवस्थेत असलेल्या या रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे. पावसाळ्यात जीवघेणी सर्कस करावी लागते. पिंपळगाव, रानवड, वाठोडा या गावातील विद्यार्थ्यांना वाढोणाबाजार येथे शिक्षणासाठी याच रस्त्यावरून मार्ग काढावा लागतो. पाऊस सुरू असल्यास त्यांची शाळाही पडते.
परिसराच्या चारही गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हाच रस्ता असल्यामुळे त्यांची फजिती होते. वाढोणाबाजार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी उपचारासाठी रुग्णाला आणायचे झाल्यास सोबतचेही आजारी पडल्यास नवल वाटू नये. पिंपळगाव येथील नाल्यावर पूल नाही. पूर आल्यास हा रस्ता बंद पडतो. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आदींकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी लक्ष दिले नाही. या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पिंपळगाव, रानवड, वाठोडा गावातील सरपंच व नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.