दारव्हा तालुक्याच्या पाणीटंचाईचा आढावा
By Admin | Updated: February 22, 2016 02:41 IST2016-02-22T02:41:33+5:302016-02-22T02:41:33+5:30
सध्या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समाधानकारक स्थिती असली तरी काही दिवसांत जिल्हाभर पाणीटंचाई जाणवणार आहे.

दारव्हा तालुक्याच्या पाणीटंचाईचा आढावा
पालकमंत्री : पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच उपाययोजना करा
यवतमाळ : सध्या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समाधानकारक स्थिती असली तरी काही दिवसांत जिल्हाभर पाणीटंचाई जाणवणार आहे. संभाव्य पाणीटंचाई जाणविणाऱ्या गावांनी आतापासूनच तयारीला लागून याबाबतचा आराखडा सादर करणे, तो मंजूर करून घेणे आणि पाणीटंचाईपूर्वीच उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
पालकमंत्री राठोड यांनी दारव्हा तालुक्यातील पाणीटंचाई, जलयुक्त शिवार आणि रोजगार हमी योजनेचा बचत भवनात आढावा घेतला. ते म्हणाले, नळ योजनांची विशेष दुरूस्ती, टाकी बांधणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, विहीर खोलीकरण, विंधन विहिरी घेणे यासह तात्पुरत्या पूरक योजना वेळेत पूर्ण कराव्यात. अधिकाऱ्यांनीही पाणीटंचाईच्या योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
बैठकीला उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार प्रकाश राऊत, गटविकास अधिकारी संजय गुहे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी तालुक्यातील ९७ गावांच्या पाणीटंचाईबाबत गावनिहाय आढावा घेतला. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि नागरिकांकडून पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेतली. पाणीटंचाईची शक्यता असलेल्या गावांचा समावेश टंचाई आराखड्यात करण्यात आला. मंजूर आराखड्यानुसार कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दिरंगाई केल्यास कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, गटविकास अधिकाऱ्यांनी कामाचा साप्ताहिक आढावा आणि अहवाल घ्यावा, असेही सांगितले.
आढाव्या दरम्यान काही गावांमध्ये दूषित पाणी, नळ योजनेच्या वीज देयकांचा भरणा आदी प्रश्न समोर आले. याप्रमाणे सुधारीत आराखडा सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तांडा वस्ती सुधार योजनेतून यावर्षी केवळ पाणी पुरवठा आणि स्वच्छतागृहांसाठीच निधी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचाही आढावा घेतला. २०१६-१७ मध्ये ११ गावांत हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गावासाठी पालक अधिकारी नेमण्यात आला आहे. तसेच शिवार फेरीसाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घ्यावीत, यातील कुशल आणि अकुशल कामांचा समतोल राखावा, असेही त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)