ठाणेदारांच्या कामगिरीचा ग्रुप कॉलवरून आढावा
By Admin | Updated: October 4, 2015 00:34 IST2015-10-04T00:34:35+5:302015-10-04T00:34:35+5:30
जिल्ह्यातील ठाणेदारांची कामगिरी सुधारावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ग्रुप कॉलच्या माध्यमातून आढावा घेणे सुरू केले आहे.

ठाणेदारांच्या कामगिरीचा ग्रुप कॉलवरून आढावा
यवतमाळ : जिल्ह्यातील ठाणेदारांची कामगिरी सुधारावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ग्रुप कॉलच्या माध्यमातून आढावा घेणे सुरू केले आहे. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी हा ग्रुप कॉल केला जातो. या माध्यमातून ठाण्यात आठवडाभरात दाखल झालेले गुन्हे, पेंडिंग गुन्हे आणि निकाली निघालेले गुन्हे याची झाडाझडती घेतली जाते.
प्रत्येक ठाण्यातील आठवड्याभरात झालेल्या कामकाजाचे अवलोकन या ग्रुप कॉलवरून केले जाते. त्यामध्ये भाग - ५, ६ आणि ईडीचे गुन्हे, वॉरंट, केसेस, अटकेतील आरोपी, प्रलंबित असलेले गुन्हे, निकाली निघालेले गुन्हे आणि विविध प्रकरणात झालेल्या शिक्षा याची विचारणा पोलीस अधीक्षकांकडून केली जाते. या ग्रुप कॉलच्या माध्यमातून ठाणेदाराचे त्या आठवड्यातील एकंदर कामकाज काय याची खातरजमा करण्यात येते. या माध्यमातून ठाणेदारांना कामगिरी सुधारण्याबाबत वारंवार सूचना देण्यात येतात.
कोणत्याही परिस्थितीत गुन्हे प्रलंबित राहू नये, संबंधित ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढवावे यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले जाते.
विशेष करून शनिवारी सायंकाळी ५ ते ७ च्या सुमारास जिल्ह्यातील संपूर्ण ठाण्यांचा आढावा घेतला जातो. (कार्यालय प्रतिनिधी)