महसूलचे वृक्ष चोरट्यांचे लक्ष्य
By Admin | Updated: February 25, 2016 02:24 IST2016-02-25T02:24:35+5:302016-02-25T02:24:35+5:30
जंगलातील मौल्यवान वृक्षांवर चालविली जाणारी कुऱ्हाड पर्यावरणाला धोका निर्माण करण्यासोबतच शासनाच्या लाखो रुपयांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे.

महसूलचे वृक्ष चोरट्यांचे लक्ष्य
सर्रास होते तोड : वनविभागाकडून सुरू आहे डोळेझाक
अब्दुल मतीन पारवा
जंगलातील मौल्यवान वृक्षांवर चालविली जाणारी कुऱ्हाड पर्यावरणाला धोका निर्माण करण्यासोबतच शासनाच्या लाखो रुपयांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. संबंधित यंत्रणा ही बाब नियंत्रणात आणण्यात सपशेल अपयशी ठरलेली असताना आता महसूल विभागाचे जुने वृक्ष कापले जात आहे. चोरट्यांसह गावातील काही लोकांनीही या वृक्षांना आपले लक्ष्य केले आहे. वनविभागाची मात्र याकडे डोळेझाक सुरू आहे.
कुठल्याही गावालगत असलेल्या शासनाच्या जागेतील वृक्षावर महसूल विभागाची मालकी असते. या वृक्षाची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रातील वनविभागाकडे असते. लाखो रुपयांची वृक्ष महसूल विभागाची आहेत. यामध्ये सागवानासह इतर वृक्षांचा समावेश आहे. शासनाच्याच मालकीच्या असलेल्या या वृक्षांची देखभाल वनविभागाकडून प्रामाणिकपणे केली जात नाही. त्यामुळे चोरटे आणि काही गावातील लोकांकडून त्याची तोड केली जात आहे. काही लोकांकडून अतिक्रमण करण्यासाठी अशी वृक्ष पाडली जात आहे. कुणाकडूनही अडवणूक झाली नाही तर अशा ठिकाणी कायमस्वरूपी वस्ती केली जाते. यासाठी मोठमोठी वृक्ष पाडली जात आहेत. परिसरातील गणेरी येथे महसूल विभागाचे मोठमोठे वृक्ष काही लोकांनी कापले आहे.
या वृक्षांना सुरुवातीला आग लावून दिली जाते. संपूर्ण झाड वाळल्यानंतर त्यावर कुऱ्हाड चालविली जाते. एकीकडे वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तर दुसरीकडे १० ते १५ वर्षांपूर्वीची मोठमोठी वृक्ष तोडली जात आहे. वनविभागाचे कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. त्यामुळे त्यांचे या वृक्षतोडीवर नियंत्रण नाही. तर दुसरीकडे महसूल विभाग आपण वनविभागावर जबाबदारी सोपविल्याचे सांगत हात झटकत आहे. या प्रकारात शासनाचे मात्र नुकसान होत आहे.