नेरमध्ये ३४ सोसायट्यांची जबाबदारी तीन गटसचिवांवर
By Admin | Updated: May 23, 2015 23:56 IST2015-05-23T23:56:46+5:302015-05-23T23:56:46+5:30
सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांची नाळ वर्षानुवर्षांपासून जुळली आहे. शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज देऊन वसुलीसाठी सहकारी ....

नेरमध्ये ३४ सोसायट्यांची जबाबदारी तीन गटसचिवांवर
शेतकऱ्यांना त्रास : सेवानिवृत्त सचिवांकडेही सोपविली जबाबदारी
नेर : सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांची नाळ वर्षानुवर्षांपासून जुळली आहे. शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज देऊन वसुलीसाठी सहकारी संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण असते. मात्र तालुक्यात असलेल्या ३४ सोसायट्यांचा कारभार केवळ तीन गटसचिवांवर आहे. सहा ठिकाणी सेवानिवृत्त झालेल्या सचिवांना काम करावे लागत आहे. सचिवांवर कामाचा ताण वाढल्याने शेतकऱ्यांना टोलविले जाते. या प्रकारात ते कमालीचे त्रस्त झाले आहेत.
गटसचिव जे.एन. पठाण यांच्याकडे नेर-नबाबपूर, पाथ्रडगोळे, लोणी, धनज, चिखली (कान्होबा), टाकळी (सलामी), सिंदखेड, पिंपळगाव (डु), पिंपळगाव (काळे), इंद्रठाणा, चिचगाव या ११ गावांची जबाबदारी आहे. व्ही.एन. गोळे यांच्याकडे वटफळी, पिपरी (कलगा), दगडधानोरा, शहापूर, सारंगपूर, मालखेड (खु), मालखेड (बु), बोरगाव (लिंगा), उत्तरवाढोणा, कोलुरा, बाणगाव ही ११ गावे आहे. तिसरे सचिव एस.व्ही. बांडे हे ब्राह्मणवाडा (प), खरडगाव, दोनद, सावरगाव, मोझर, आजंती, रत्नापूर, चिकणी (डो), घारेफळ, सातेफळ, अडगाव, कारखेडा या १२ गावांची जबाबदारी सांभाळत आहे.
सहकारी संस्थेतून निवृत्त झालेले सहा सचिव प्रतिसोसायटी तीन हजार रुपयांप्रमाणे काम करत आहे. यात व्ही.सी. राठोड, सी.डी. घरडे, व्ही.बी. देशमुख, एस.जी. कावगे, पी.पी. जिमकर, एम.बी. श्रुंगारे यांचा समावेश आहे. प्रत्येक सचिवाकडे चार ते पाच सोसायट्यांची जबाबदारी आहे. यातील काही सचिव शेतकऱ्यांना अतोनात त्रास देतात. काहींनी सावकारी सुरू केली आहे. तर काहीचे काम दलालाच्या भरोशावर सुरू आहे. या प्रकारात शेतकरी त्रस्त झाला आहे. सकाळी शेतीची कामे सोडून पीककर्ज मंजुरीसाठी शेतकरी येतात. सचिवांकडून त्यांना उद्धट वागणूक दिली जाते. कर्जमंजुरीसाठी येरझारा माराव्या लागतात. दलालांशी संपर्क केल्याशिवाय कधीही काम होत नाही. हा प्रकार कधी थांबणार, असा त्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
(तालुका प्रतिनिधी)
कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे
नेर तालुक्यातील अनेक सोसायट्यांनी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले आहे. मात्र पाथ्रड (गोळे) येथील सचिव पठाण यांच्या दिरंगाईमुळे अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित आहे. सदर सचिव वैयक्तिक व्यवसायात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांना कर्जासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शेतमजूर-शेतकरी संघटनेचे सचिव पंजाबराव खोडके यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली आहे. या संस्थेचे ५० शेतकरी सभासद आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केला. परंतु त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून दिलेले नाही. वैयक्तिक कामातच ते व्यस्त राहात असल्याचा आरोप आहे. सदर तलाठ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पंजाबराव खोडके यांच्यासह या सोसायटीअंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.