शिवसेनेला घरोबा सोडवेना
By Admin | Updated: June 16, 2014 23:43 IST2014-06-16T23:43:12+5:302014-06-16T23:43:12+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेत राष्ट्रवादीसोबतच्या सत्तेतून बाहेर पडणार असल्याची घोषणा शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संजय राठोड यांनी केली. प्रत्यक्षात सत्तेतून बाहेर पडत

शिवसेनेला घरोबा सोडवेना
यवतमाळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेत राष्ट्रवादीसोबतच्या सत्तेतून बाहेर पडणार असल्याची घोषणा शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संजय राठोड यांनी केली. प्रत्यक्षात सत्तेतून बाहेर पडत असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले नाही. शिवसेनेचे संपर्क नेते आमदार दिवाकर रावते यांच्यासमोर ही घोषणा केली. त्यानंतर कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. यावरून शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता सोडवत नसल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना शिवसेना नेत्यासोबत ‘डिलिंग’ केल्याची जाहीर वाच्यता राष्ट्रवादीकडून होत आहे. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते अशी भूमिका घेऊच शकणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे. नेत्यांच्या दबावात ही घोषणा केली असेल, असा तर्क लावला जात आहे.
राज्यात सिंचन घोटाळ््यावरून शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्याला खिंडित गाठण्याचा प्रयत्न करत आहे, तर स्थानिक पातळीवर शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीसोबतची सलगी तोडण्यास तयार नाही. यावरून नेमके कोणते डिलिंग झाले, असा संशय राजकीय गोटात निर्माण झाला आहे.
शिवसेनेला जिल्हा परिषदेतील सत्तेत कोणताच फायदा झाला नाही. याची कबुली शिवसेना नेत्यांनी यापूर्वी अनेकदा जाहीररीत्या दिली. जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे दोन्ही सभापती काँग्रेसच्या आश्रयाला आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेचा सहभाग हा केवळ नावापुरताच असल्याची प्रतिक्रया शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांकडून ऐकायला मिळत आहे. यापेक्षा विरोधी बाकावर बसून शिवसेना स्टाईलने कामे करवून घेतली असती. सत्तेत असल्याने तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. केवळ स्थानिक नेत्याच्या संदिग्ध भूमिकेमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
विधानसभेत जनतेसमोर जाण्यापूर्वी किमान ही कोंडी फोडण्यात यावी, अशी सुप्त इच्छा शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांची आहे. ज्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या अपहाराची प्रकरणे काढून लक्तरे वेशीवर टांगली जात आहे, तोच कित्ता जिल्ह्यात गिरवून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर थेट हल्ला चढविण्याची इच्छा आहे. मात्र नेत्याने उपयोग नसलेल्या सत्तेतील भागीदारी अजूनही कायम ठेवल्यामुळे अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.
आतापर्यंत दोनदा आमदार संजय राठोड यांनी राष्ट्रवादीसोबत फारकत घेण्याची वल्गना केली. त्याला प्रत्यक्षात कृतीची जोड मिळाली नाही. त्यामुळे अजुनतरी आहे तसेच चालू ही भूमिका घेवून शिवसेनेचे शिलेदार काम करत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)