रेती चोरट्यांकडून १६ लाखांचा दंड वसूल
By Admin | Updated: December 20, 2015 02:39 IST2015-12-20T02:39:07+5:302015-12-20T02:39:07+5:30
गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कळंब महसूल विभागाने कारवाईची धडक मोहीम राबविली.

रेती चोरट्यांकडून १६ लाखांचा दंड वसूल
नऊ जणांवर गुन्हा : ७९ जणांवर कारवाई
कळंब : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कळंब महसूल विभागाने कारवाईची धडक मोहीम राबविली. या अंतर्गत १६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एका आर्थिक वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ७९ लोकांकडून दंड आकारणी करण्यात आली. एवढेच नव्हे, तर नऊ लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात आली.
सर्वाधिक प्रकरणे रेती चोरीचे आहे. केवळ दोन प्रकरणे मुरुम चोरीचे आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त रेती चोरटे वर्धा जिल्ह्यातील आहे. महसूल विभागाच्या या धडक मोहिमेनंतर सर्रासपणे चोरटी वाहतूक बंद आहे. असे असले तरी, अधूनमधून चोरीचे प्रकार उघडकीस येत आहे. संपूर्ण रेती चोरी थांबविणे महसूल प्रशासनाला अजूनही जमलेले नाही.
फौजदारी कारवाई झालेल्यांमध्ये नितीन रघाटाटे, चेतन डहाके, दिलबाग पड्डा, नरेश डेहनकर, अमोल गुल्हाने, नरेश पाटील, शेख अशफाक शेख रज्जाक, अशोक मालखुरे, अमर दातार आदींचा समावेश आहे. ७९ लोकांना गौण खनिज चोरताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला. तांबा घाटातून चोरटी वाहतुक
बाभूळगाव हद्दीतील तांबा घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. रेती जरी बाभूळगाव तालुक्यातील घाटातील असली तरी, ती कळंब तालुक्याच्या हद्दीतून कळंब व बाभूळगावकडे नेली जाते. एवढेच नव्हे, तर नदीच्या पैलरीरावरुन वर्धा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक केली जात आहे. याकडे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)