परिस्थितीवर मात करीत ध्येय गाठा
By Admin | Updated: August 8, 2015 02:41 IST2015-08-08T02:41:41+5:302015-08-08T02:41:41+5:30
विषम परिस्थितीतही शिक्षण घेवून अनेकांनी यश मिळविले आहे. परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येते.

परिस्थितीवर मात करीत ध्येय गाठा
दिलीप चव्हाण : मोफत शिकवणी वर्गाचे उद्घाटन, नाग संघटनेचा पुढाकार
यवतमाळ : विषम परिस्थितीतही शिक्षण घेवून अनेकांनी यश मिळविले आहे. परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येते. शिक्षणाचे कोणतेही क्षेत्र लहान-मोठे नसते. कोणत्याही शाखेतून शिक्षण घेवून यशाची शिखरं पादाक्रांत करता येते, असे प्रतिपादन जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था आणि ‘नाग’ संघटना संचालित मोफत शिकवणी वर्गाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. डॉ. सुभाष जमधाडे अध्यक्षस्थानी होते. नगरपरिषद प्राथमिक मुलांची शाळा क्र.५ येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साहेबराव कदम, पोलीस उपनिरीक्षक राठोड, मोहसीन शेख, प्रा. संजय तामगाडगे, विलास कांबळे, प्रा. प्रशांत जगताप, मनीषा रामटेके आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात दहावीत यश मिळविलेल्या विशाखा खोब्रागडे आणि इतर वर्गातून आदर्श विद्यार्थी ठरलेले प्रतीक शर्मा, अंकित कांबळे, प्रतीक्षा गेडाम, वृषाली घरडे, सानिका डोंगरे यांचा रोख रक्कम देवून सत्कार करण्यात आला. शिकवणी वर्गासाठी सहकार्य करणारे प्रा. प्रशांत जगताप, विलास कांबळे यांना शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविकातून आनंद गायकवाड यांनी शिकवणी वर्गाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमासाठी रोशनी पुनवटकर, अशोक लोखंडे, सुनील पाईकराव, अमृता अढाऊ, सुरज बोरकर, निखिल मेश्राम, गौतम गोंडाणे, आकाश गायकवाड, सुहास खैरकार, अक्षय भोसले आदींनी पुढाकार घेतला. मोफत शिकवणी वर्गाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सोपे जाणार आहे. (वार्ताहर)