लोकसंख्या वाढीचा दर हळूहळू घटतोय

By Admin | Updated: July 11, 2015 00:19 IST2015-07-11T00:19:14+5:302015-07-11T00:19:14+5:30

गेल्या अर्धशतकात जिल्ह्याची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे.

The rate of population growth is gradually decreasing | लोकसंख्या वाढीचा दर हळूहळू घटतोय

लोकसंख्या वाढीचा दर हळूहळू घटतोय

दरहजारी पुरुषांमागे ९५० महिला
१८ टक्के अक्षरशत्रू  सर्वांची धाव शहराकडेच  महाविद्यालयांच्या आवाक्याबाहेर विद्यार्थिसंख्या
रोजगाराच्या प्रतीक्षेत कामगार चौक

यवतमाळ : गेल्या अर्धशतकात जिल्ह्याची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रभावी जनजागृतीमुळे लोकसंख्या वाढीच्या वेगाला ‘ब्रेक’ लागल्याचे दिसते. परंतु, अद्यापही उपलब्ध सोयीसुविधा, साधनसामुग्री व नैसर्गिक संसाधनांच्या तुलनेत जिल्ह्याला लोकसंख्येचा भार पेलवण्यापलिकडे गेला आहे.
वाढती लोेकसंख्या कायमच चिंतेचा विषय. ताज्या जनगणनेनुसार, जिल्ह्याची लोकसंख्या २७ लाख ७२ हजार ३४८ इतकी अफाट आहे. हा आकडा महाराष्ट्रातील एकूण लोकसंखेच्या २.६ टक्के आहे. जिल्ह्यातील लोकसंख्यावाढीचे प्रमाण १९४१ ते १९७१ पर्यंत प्रचंड होते. वाढत्या लोकसंख्येला नंतरच्या काळात थोडा बे्रक लागला. आज लोकसंख्यावाढीचा वेग हळूहळू कमी होत आहे. गत ५० वर्षांत जिल्ह्याची लोकसंख्या १७ लाखाने वाढली. वाढत्या लोकसंख्येनुसार गरजाही वाढल्या. मात्र, सेवा-सुविधा पुरविण्यात प्रशासनासह लोकप्रतिनिधींना अपयश आले. परिणामी, आजही प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी जनसामान्यांना धडपड करावी लागत आहे.
यवतमाळ जिल्हा हा सह्याद्री पर्वतरांगांच्या शेवटच्या टोकावर आहे. जिल्ह्यात २०४० गावे आहेत. या गावांचे प्रशासन सांभाळण्यासाठी १२०७ ग्रामपंचायती आणि गटग्रामपंचायती आहेत. गाव, वाड्या, वस्त्या आणि पोड यात जिल्ह्याची लोकसंख्या विखुरली आहे.
काही वस्त्या टेकड्यांवर तर
काही दऱ्या खोऱ्यात वसल्या आहेत.
काही भागांत रस्ते झालेत. मात्र, अनेक गावे अजूनही रस्त्याविना तुटलेपण भोगत आहेत. सर्वच गावांमध्ये प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था आहे. मात्र, त्यानंतरच्या शिक्षणासाठी शहराकडेच धाव घ्यावी लागते.
शिक्षण आणि रोजगार या दोन प्रमुख कारणांसाठी शहराकडे नागरिकांचा लोंढा वाढला आहे. शहराच्या मर्यादित क्षेत्रावर नागरिकांचा अतिरिक्त भार वाढल्याने संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. (शहर वार्ताहर)

सर्वाधिक लोकसंख्या ग्रामीण भागात
२०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी ७८.४२ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. तर २१.२८ टक्के लोकसंख्या शहरी भागात स्थिरावली आहे. नागरी लोकसंख्या शहरासह ग्रामीण भागात विखुरली आहे. यामध्ये जिल्हा मुुख्यालय असलेले यवतमाळ, पांढरकवडा, घाटंजी, वणी, पुसद, उमरखेड, दारव्हा, दिग्रस आणि नेर या नऊ तालुक्यांचा समावेश आहे. या शहरांचा भार वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, देवगिरी, श्रीरामपूर, उमरसरा आणि राजूर या नागरी भागात वाढला आहे. सर्वाधिक लोकसंख्या यवतमाळ तहसीलमधील वडगाव आणि वाघापूरमध्ये आहे.

महिलांचा जन्मदर वाढतोय
गेल्या काही काळापासून कन्याभ्रूणहत्येविरुद्ध मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. शिवाय, अनेकांवर कारवाईदेखील झाली. या सर्वांचा परिणाम म्हणजे जिल्ह्यात महिलांचा जन्मदर काहीसा वाढताना दिसतो. १९९१ ते २००१ या कालावधीत दर हजारी पुरुषामागे महिलांचे प्रमाण ९४२ होते. ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण ९४४ होते. तर शहरी भागात हे प्रमाण ९३६ होते. जनजागृतीनंतर २००१ ते २०११ या कालावधीत दर हजारी पुरुषांमागे महिलांचे प्रमाण ९५२ झाले. ग्रामीण भागात दर हजारी परुषांमागे महिलांचे प्रमाण ९५० आहे. तर शहरी भागात महिलांचे प्रमाण ९६२ आहे.
१८ टक्के नागरिक अक्षरशत्रू
जिल्ह्यात ८२.८२ टक्के नागरिक साक्षर आहेत. ८९.४१ टक्के पुरुष, तर ७५.७३ टक्के स्त्रिया साक्षर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक साक्षर नागरिक यवतमाळात आहेत. या तालुक्यात ८८ टक्के नागरिक साक्षर आहेत. सर्वात कमी साक्षरता झरी तालुक्यात आहे. तेथे साक्षरतेचे प्रमाण ७७.७० टक्के आहे. ग्रामीण भागातील साक्षरता ८०.४७ टक्के आहे. तर शहरी भागातील साक्षरता ९१.२४ टक्के आहे.
शहरात मजूर प्रतीक्षेत; खेड्यात मजुरांची प्रतीक्षा
खेड्यांकडे परत चला, असा नारा महात्मा गांधींनी दिला होता. मात्र, आज त्याच्या अगदी उलट चित्र आहे. रोजगाराच्या शोधात दररोज शेकडो कामगार शहरात येतात. यातून मजूर चौकच तयार झाला आहे. या ठिकाणी मजूर येतात. कामावर पाहिजे ते ठेकेदार मजूर घेऊन जातात. प्रत्येकाला रोजगार मिळेल याची शाश्वती नाही. याउलट चित्र ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागात कामासाठी रोजदार शोधावा लागतो. पैसा देऊनही मजूर उपलब्ध होत नाही.

Web Title: The rate of population growth is gradually decreasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.