वणी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यात पाऊस

By Admin | Updated: June 22, 2015 02:11 IST2015-06-22T02:11:05+5:302015-06-22T02:11:05+5:30

वणी आणि मारेगाव तालुक्यात गेल्या २० तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे.

Rain in Wani, Maregaon, Paharkawakda taluka | वणी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यात पाऊस

वणी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यात पाऊस

वणी/मारेगाव : वणी आणि मारेगाव तालुक्यात गेल्या २० तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दोनही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासांत मारेगाव तालुक्यात ६३, तर वणी तालुक्यात तब्बल ७२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे सोयाबीन बियाणे जमिनीत दबण्याची शक्यता वाढली आहे.
शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास या दोनही तालुक्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. यावेळी विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासूनच दोनही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. वणी तालुक्यात शनिवारी रात्रभर आणि रविवार पुन्हा पहाटेपासून पाऊस सुरू झाला. रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे शहरासह तालुक्यातील जीनजीवनावर त्याचा परिणाम झाला. तथापि रविवारी सुटी असल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वणी तालुक्यात कपाशीची बहुतांश पेरणी आटोपली आहे. आता काही शेतकऱ्यांनी सोयाबिनची पेरणी सुरू केली आहे. मात्र शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे जमिनीतील सोयाबीन बियाणे आता दबण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. यावर्षी समाधानकारक पावसामुळे कपाशीची पेरणी व्यवस्थित झाली. त्यामुळे बळीराजा समाधानी दिसत होता. मात्र शनिवारी सायंकाळापसून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे भाव उमटू लागले आहेत.
वणी तालुक्यात संततधार पावसाने १६ घरांची, तर एका गोठ्याची अशंत: पडझड झाली. त्यात शिंदोला परिसरातील चनाखा येथील पाच घरे आणि एका गोठ्याची पडझड झाली. राजूर कॉलरी येथील चार घरे, भांदेवाडा येथील तीन घरे, भालर परिसरातील बेसा येथील तीन घरांचीही अंशत: पडझड झाली आहे. याशिवाय कुठेही नुकसान झाले नाही. मात्र बहुतांश शेतात आता पावसाचे पाणी शिरले आहे. त्यातच पाऊस सुरू असल्याने रविारी शेतकऱ्यांना शेतात जाणेही जमले नाही. त्यामुळे शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी कासावीस झाले आहेत.
मारेगाव तालुक्यातही शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर आणि रविवारी दिवसभर सुरूच होता. या पावसामुळे कपाशी, सोयाबिनचे बियाणे दबण्याची भिती वर्तविली जात आहे. सोबतच अुकंरलेली दोन पानांची कपाशीची झाडे संततधार पावसाने धोक्यात सापडली आहे. गेल्या आठवडाभर मारेगाव तालुक्यात जवळपास दररोज पाऊस कोसळत आहे. २० जूनला सायंकाळी ६ वाजता तालुक्यात पावसाला सुरूवात झाली. दुसऱ्या दिवशी रविवारीही संततधार पाऊस सुरूच आहे.
संततधार पावसामुळे शेतात व इतरत्र पाणीच पाणी साचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अुकंरलेले बियाणे पाण्यात सापडल्याने ते सडून मरण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकरी कपाशीची पेरणी झाल्यानंतर सोयाबिनची पेरणी करतात. सध्या सर्वत्र सोयाबिनची पेरणी सुरू होती. पेरणी केलेल्या सोयाबिनवर संततधार पाऊस झाल्याने पेरलेले बियाणे जमिनीतच दबण्याची भितीही निर्माण झाली आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील कोरडे पडलेले नाले, विहीर यांच्या पाणी पातळीत मात्र वाढ झाली आहे. पांढरकवडा तालुक्यात जोरदार पाऊस बरसला
तालुक्यात शनिवारपासून जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहे. आजपर्यंत तालुक्यात तब्बल १८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी तालुक्यातील खुनी व पैनगंगा या नद्या दुथडी भरून वाहात होत्या. पीक पेरणीस अनुकूल ठरलेल्या या पावसामुळे बळीराजा समाधानी आहे. तालुक्यात वेळीच वरूण राजाचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. आणखी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही, ते शेतकरीही पेरणी उरकण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी तालुक्यात ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या १७ जूनला रात्री २५ मिलीमीटर पाऊस झाला. इतर दिवशी रात्री तुरळक पावसाची नोंद झाली आहे.
झरी तालुक्यात १४८ मिलीमीटर
झरी - शनिवारी मध्यरात्री तालुक्यात पावसाला तालुक्यात सुरूवात झाली. हा पाऊस रविवारी सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरूच होता. तालुक्यात आजपर्यंत १४८ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे तेलंगणा व महाराष्ट्राच्या सिमेजवळून वाहणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी रात्रीपासूनच पावसामुळे वीज गुल झाली होती. ती रविवारीही परतली नव्हती. वृत्तलिहिस्तोवर वीज परतली नसल्याने तालुक्यातील ग्रामस्थ संतापले होते. (लोकमत चमू)

Web Title: Rain in Wani, Maregaon, Paharkawakda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.