१६ तास अभ्यासातून रवींद्रने मिळविले यश
By Admin | Updated: April 7, 2016 02:35 IST2016-04-07T02:35:24+5:302016-04-07T02:35:24+5:30
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना रवींद्र राठोड या तरुणाने दररोज १६ तास अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले.

१६ तास अभ्यासातून रवींद्रने मिळविले यश
प्रतिकूल परिस्थितीवर मात : अवघ्या २२ व्या वर्षी झाला उपजिल्हाधिकारी
उमरखेड : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना रवींद्र राठोड या तरुणाने दररोज १६ तास अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. एवढेच नव्हे तर अवघ्या २२ व्या वर्षी उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळविला
रवींद्र बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर बाहेरगावी जाऊन उच्च शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती. पण गरिबीमुळे त्याला ते शक्य झाले नाही. पदवीचे शिक्षण घेतानाच मग त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दररोज १६ तास अभ्यास, अशी मेहनत सुरू झाली. त्याला यशही मिळाले. २०१५ मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन रवींद्र राठोड मंत्रालयात सहायक म्हणून रूजू झाले. पण एवढ्यावरच न थांबता आणखी वरच्या पदासाठी त्याची तयारी सुरूच होती. त्यानंतर विक्रीकर निरीक्षक पदासाठीची परीक्षा त्याने पहिल्याच झटक्यात उत्तीर्ण केली. पण तो रूजू झाला नाही. सुटीच्या दिवशी ग्रंथालयात जाऊन १६ तास अभ्यास सुरू होताच. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने तो उत्तीर्णही झाला. उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. जनुनासारख्या छोट्याशा खेड्यातील तांड्यातून आलेल्या रवींद्रने अखेर आपल्या आईवडीलांचे स्वप्न पूर्ण केले. रवींद्रच्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य असतानाही तो हे यश गाठू शकला. मामा संतोष जाधव व निरंजन जाधव यांची मदत मोलाची ठरल्याचे रवींद्र सांगतो. रवींद्रने मिळविलेले यश त्याचा गावाला अख्या महाराष्ट्रात यश देऊन गेले. (शहर प्रतिनिधी)