हिवरी उच्च प्राथमिक शाळेचा कारभार रामभरोसे
By Admin | Updated: June 29, 2015 00:21 IST2015-06-29T00:21:02+5:302015-06-29T00:21:02+5:30
यवतमाळ जिल्हा परिषदेंतर्गत हिवरी येथील उच्च प्राथमिक मराठी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राऊत हे गेल्या दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले.

हिवरी उच्च प्राथमिक शाळेचा कारभार रामभरोसे
आदेशाला केराची टोपली : मुख्याध्यापकांचा प्रभार घेण्यास नकार
हिवरी : यवतमाळ जिल्हा परिषदेंतर्गत हिवरी येथील उच्च प्राथमिक मराठी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राऊत हे गेल्या दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर येथील मुख्याध्यापकाचा प्रभार सेवाज्येष्ठतेनुसार वर्षा देशमुख यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार देण्याचे ठरले. परंतु संबंधित शिक्षिका देशमुख यांना मेडिकल सुटीवर जावे लागले. त्यामुळे त्यांची रजा संपेपर्यंत सध्या कुणीही या पदावर नाही. त्यामुळे प्राथमिक शाळेचा कारभार रेंगाळला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्षा देशमुख जॉईन झाल्या परंतु आपण मुख्याध्यापकांचा प्रभार स्वीकारणार नसल्याचे त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांना सांगितले. त्यानंतर संबंधित सदस्यांनी गटशिक्षणाधिकारी निलोफर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी केंद्र प्रमुख चावरकर यांच्याशी बोलून यामध्ये काय होवू शकते ते पाहते, असे सांगितले. एकंदरीत या ठिकाणी शिक्षकांवर वरिष्ठांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे दिसून येते. कुणीही या शाळेच्या मुख्याध्यापकाचा प्रभार स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. शालेय पोषण आहार पुरवठाधारकांचे गेल्या सहा महिन्यांपासून देयके रखडले असल्याने यापुढे शालेय पोषण आहार पुरवठा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गणवेश वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, आर्थिक व्यवहार, रखडलेले बांधकाम पूर्ण करून घेणे, शाळेच्या वॉल कंपाऊंडचा प्रश्न आदी विविध कामे मुख्याध्यापकांअभावी रखडले आहेत. सध्या उपलब्ध शिक्षकांवर कोणताही वचक नसल्याने ते कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. या संदर्भात प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होवू शकल्या नाही. (वार्ताहर)
सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षिका वर्षा देशमुख यांना प्रभार घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी सुटी का टाकत आहे, प्रभार घेत नसाल तर लेखी द्यावे, असेही सांगण्यात आले आहे. तेव्हा त्यांनी आपण लेखी देणार असल्याचे दूरध्वनीवर सांगितले आहे. लवकरच हा प्रश्न निकाली निघेल.
- एस. निलोफर, गटशिक्षणाधिकारी, यवतमाळ