बंधाऱ्यांच्या यशस्वीतेवर प्रश्न
By Admin | Updated: June 15, 2015 02:34 IST2015-06-15T02:34:35+5:302015-06-15T02:34:35+5:30
टंचाईमुक्त शिवारासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे.

बंधाऱ्यांच्या यशस्वीतेवर प्रश्न
जलयुक्त शिवार योजना : पारवा परिसरात निकृष्ट कामांसोबतच उंचीही कमी
पारवा : टंचाईमुक्त शिवारासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर बंधारे बांधले जात आहे. बहुतांश ठिकाणी प्राकलनाला डावलून आणि निकृष्ट साहित्य वापरून कामे होत असल्याने बंधाऱ्यांच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. परिसरात अनेक ठिकाणी निर्माणाधीन बंधाऱ्यांची ही स्थिती आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही.
परिसरातील विविध गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. नदी, नाले, विहिरी, हातपंप कोरडे पडतात. या स्थितीत नागरिकांना गावापासून दूर अंतरावर असलेल्या स्रोतांवर पाण्यासाठी धाव घ्यावी लागते. उन्हाचे चटके झेलत आणि मजुरी बुडवून पाण्यासाठी भटकावे लागते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या येरझारा सुरू असतात. ही परिस्थिती दूर व्हावी यासाठी नदी-नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधले जात आहेत. जलस्रोतांची पातळी वाढण्यासोबतच जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आदी या मागील उद्देश आहे. मात्र कंत्राटदारांकडून या महत्त्वाकांक्षी योजनेला खिंडार पाडले जात आहे. बंधाऱ्याच्या बांधकामासाठी रेती गाळली जात नाही, नाल्याची वापरण्यात येते. सिमेंटचा उपयोग अतिशय कमी केला जातो. गज आणि गिट्टी प्राकलनानुसार घेतली जात नाही. बांधकाम झाल्यानंतर त्यावर पाण्याचा मारा अपवादानेच होतो. या सर्व बाबींमुळे बंधाऱ्याची कामे निकृष्ट होत आहे.
याशिवाय नाल्यांवर बांधण्यात आलेले बंधारे जमिनीच्या समतल आहे. जास्तीत जास्त पाणी अडले जावे, हा उद्देश असला तरी अनेक ठिकाणी केवळ एक ते दीड फूट उंची घेवून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडणे अशक्य आहे. वास्तविक चार ते पाच फूट उंची किंवा नदी अथवा नाल्याच्या पात्राची खोली वाढवून तेथे बंधारा होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु ही दक्षता कुठेही घेण्यात आलेली नाही. पुराचे पाणी बंधाऱ्यावरून वाहून जाणार आहे. त्यामुळे अतिशय कमी पाणी त्याठिकाणी अडविले जाईल. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच हे बंधारे कोरडे पडतील, अशी स्थिती आजची आहे.
या कामांविषयी नागरिकांनी काही सूचना केल्यानंतरही संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नाही. कंत्राटदाराने मजुरांच्या भरवशावर काम सोडून दिले. त्यांनी कुठलेही नियम पाळले नाही. आता मात्र या बंधाऱ्यांच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट कामांमुळे ते वाहून जाण्याची भीती आहे, तर दुसरीकडे उंची कमी असल्याने पाण्याची साठवण क्षमता नाममात्र असणार आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले बंधारे काही दिवसातच कुचकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पारवा गावालगत दोन ठिकाणी सदर योजनेंतर्गत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांची स्थिती अशीच आहे. अनेकांच्या शेतातून गेलेल्या नाल्यावर बंधारे बांधण्यात आलेले आहे. संबंधित शेतकरीही पाणी अधिक साठविलेले असल्यास सिंचन करू शकत होते. मात्र आता ही आशाही धूसर झाली आहे. (वार्ताहर)