पूर संरक्षक भिंतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By Admin | Updated: September 1, 2014 00:16 IST2014-09-01T00:16:01+5:302014-09-01T00:16:01+5:30
गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत आर्णी मार्गावरील हिवरी गावाला पुराचा तडाखा बसत आहे. नाल्यावरील पूरसंरक्षक भिंतीअभावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी नाल्याला पूर येवून

पूर संरक्षक भिंतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
हिवरी : गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत आर्णी मार्गावरील हिवरी गावाला पुराचा तडाखा बसत आहे. नाल्यावरील पूरसंरक्षक भिंतीअभावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी नाल्याला पूर येवून गावातील अडीचशे घरात पाणी घुसले होते. त्यामध्ये गावकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. याहीवर्षी प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणाने तीच परिस्थिती आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसा झालेल्या पावसाची गावकऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून आले.
आर्णी मार्गावर हिवरी हे गाव आहे. गावाला लागूनच मोठा नाला असून त्याचे पाणी गावात शिरू नये म्हणून आजवर कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. गतवर्षी या नाल्याचे पाणी गावात शिरून अन्नधान्य आणि घरांचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. त्यानंतर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले. शाळेत आणि ग्रामपंचायत कार्यालयात पूर पीडितांची व्यवस्था करण्यात आली. या परिस्थितीवर काही दिवस उलटल्यानंतर मात्र पुराने बाधित झालेल्या कुटुंबांनाच आपले संसार उभे करावे लागले. शासनाकडून प्रभावी मदत मिळाली नाही. दरम्यान, त्यावेळी लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने पूर संरक्षक भिंत बांधण्याची कबुली दिली होती. ती आजवर पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हिवरी गावात पूर शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच खासदार फंडातून बांधलेल्या समाज भवनामुळे पाण्याचे लोट गावात शिरत आहे. त्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)