पुसदच्या भाजीबाजाराने टाकली कात
By Admin | Updated: December 25, 2016 02:39 IST2016-12-25T02:39:31+5:302016-12-25T02:39:31+5:30
रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे भाजी व फळविक्री करणाऱ्या छोट्या येथील व्यावसायिकांसाठी आठवडी

पुसदच्या भाजीबाजाराने टाकली कात
विक्रेत्यांची सोय : नगरपरिषदेतर्फे नवीन २०० गाळ्यांची निर्मिती
पुसद : रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे भाजी व फळविक्री करणाऱ्या छोट्या येथील व्यावसायिकांसाठी आठवडी बाजारातील जागेवर २०० नवीन गाळ्यांची नगरपरिषदेने निर्मिती केली आहे. त्यामुळे पुसदच्या भाजीबाजाराने कात टाकली आहे.
रस्त्यावर हातगाडी लावणाऱ्या भाजी व फळविक्रेत्यांची यामुळे सोय झाली आहे. त्यासोबतच शहरवासीयांनाही व्यवस्थित खरेदी करणे शक्य होणार आहे. पुसद शहरातील गांधी चौक ते आंबेडकर चौकादरम्यान भाजी विक्रेते व फळविक्रेते आपली हातगाडी रस्त्यावर लावून भाजी विक्री करतात. त्यामुळे या चौकादरम्यान वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण करून येथील रस्ता पूर्णत: अडवून धरला आहे. त्यामुळे येथील व्यापारी व वाहनचालकांमध्ये अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यासोबतच अपघाताच्या घटनाही अनेकवेळा घडल्या आहेत.
या घटनांची दखल घेत पुसद नगरपरिषदेने येथील शहर पोलीस ठाण्यासमोरील आठवडीबाजारात तब्बल २०० गाळ्यांची निर्मिती केली. या गाळ्यांचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाभरात तेथे विक्रेत्यांना आपला व्यवसाय सुरू करता येणार आहे. हे सर्व गाळे भाजीपाला व फळ विक्रेत्यांना नगरपरिषदेच्या नियमानुसार लवकरच देण्यात येणार आहे. संपूर्ण भाजी मार्केट व फळ मार्केट एकाच ठिकाणी आल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची मोठी सोय होणार आहे. पर्यायाने शहरवासीयांना गांधी चौक ते आंबेडकर चौकादरम्यान सातत्याने भेडसावणारा अतिक्रमण व विस्कळीत वाहतुकीचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)