एकट्या पुसद तालुक्यात ५२२ कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:00:19+5:30
सध्या तालुक्यात १२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर सुरुवातीपासून आतापर्यंत तालुक्यातील ५२२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. एकाच तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळल्याने यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आहे. तर दुसरीकडे तब्बल १७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मात्र आतापर्यंत ३८२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

एकट्या पुसद तालुक्यात ५२२ कोरोनाबाधित रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच असून जिल्ह्यात १६ तालुक्यांपैकी पुसद अतिसंवेदनशील तालुका बनला आहे. जिल्ह्यातील एकंदर तीन हजार कोरोनाबाधितांपैकी सुमारे साडेपाचशे रुग्णांची नोंद एकट्या पुसद तालुक्यात झाली आहे.
गेल्या तीन दिवसात तब्बल ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी बुधवारी एकाच दिवशी २१ रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी एका पोलिसासह दोन तलाठी व एकंदर सहा जण पॉझिटिव्ह आढळले. गुरुवारी आरोग्य विभागाच्या पथकाने ६३ जणांची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट घेतली असता हिवळणी आणि शेंबाळपिंपरी येथील दोन तलाठी व शेलू येथील एक पुरुष, शहरातील लोहार लाईनमधील दोन पुरुष, तर शुक्रवारी पोलीस वसाहतीत राहणारा मात्र दराटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी असे सहा जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. इतर ६१ जण निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यातील वालतूर रेल्वे येथील ७३ नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. हे नमुने यवतमाळला तपासणीकरिता पाठविल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी दिली.
सध्या तालुक्यात १२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर सुरुवातीपासून आतापर्यंत तालुक्यातील ५२२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. एकाच तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळल्याने यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आहे. तर दुसरीकडे तब्बल १७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मात्र आतापर्यंत ३८२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
तालुका प्रशासन म्हणते, सतर्कता बाळगा
पुसद शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.