सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ
By Admin | Updated: May 15, 2016 02:03 IST2016-05-15T02:03:15+5:302016-05-15T02:03:15+5:30
पांढरकवडा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे सर्वच विभागांचे कार्यालय आहे. त्यामुळे बाराही महिने येथे नागरिकांची गर्दी असते.

सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ
गंभीर समस्या : पांढरकवडा शहरात पाणपोर्इंची संख्या कमीच, पाण्यासाठी वणवण सुरूच
पांढरकवडा : पांढरकवडा ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे सर्वच विभागांचे कार्यालय आहे. त्यामुळे बाराही महिने येथे नागरिकांची गर्दी असते. मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसातही शहरातील सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने सर्वत्र पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे.
येथील बसस्थानक, शासकीय कार्यालये, विविध बँकेच्या शाखा, आदी ठिकाणी दररोज नागरिकांची प्रचंड गर्दी असते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसातही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची थातुरमातूर व्यवस्था केलेली दिसते. मात्र तेथे घाणीमुळे पाणी कुणीच प्राशन करू शकत नाही. पाण्याचा वापर केवळ हात-पाय धुण्यासाठी केला जात आहे. सध्या बसस्थानकात थंड पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. शहरात काही ठिकाणी केवळ एक-दोन माठ ठेवून काही सामाजिक कार्यकर्ते व संघटना आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचे समाधान मानत आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागातही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पंचायत समिती कार्यालयात मात्र बाराही महिने मुबलक व थंड पाणी उपलब्ध असते. तसेच दरवर्षी केळापूर येथील जगदंबा संस्थानतर्फे पाणपोईची व्यवस्था केली जाते. त्यासाठी येथील नगरपरिषद पाणी पुरवठा करीत आहे. हे एकमात्र उदाहरण सोडले, तर शहरात कुठेही पाणपोईची सुरूवात झालेली नसल्याचे दिसते.
शहरात तहसील, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, न्यायालय आदी महत्त्वाची कार्यालये आहे. तेथे तालुक्यातील नागरिक आपापल्या कामानिमित्त दररोज येत असतात. मात्र त्यांची तहान भागविण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे दुरापास्त झाले आहे. अधिकारी व सामाजिक संस्थांमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात काही परिसरात पाणपोई सुरू करण्याची योजना अद्याप कार्यान्वित होऊ शकलेली नाही. बसस्थानकात पेयजलसाठी जलकुंभही उभारण्यात आलेले नाही. दरवर्षी प्रवाशांना टाकीमधूनच नळाद्वारे येणारे गरम पाणीच प्राशन करावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
मे चा उत्तरार्ध आणि जूनमध्ये होणार भयावह अवस्था
गेले १५ दिवस सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला नाही. मात्र आता मे महिन्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे तसेच जूनमध्येही पाणी प्रश्न निर्माण गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी दाहीदिशा पालथ्या घालाव्या लागण्याची शक्यता आहे. बाटली बंद पाणी त्यांना आधार देईल. मात्र सामान्य नागरिकांना बाटली बंद पाणी घेणे परवडणारे नाही. त्यामुळे त्यांची फरफट होण्याची शक्यता बळावली आहे.