तीन चौकांच्या नामकरणाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:54 IST2018-11-26T21:54:10+5:302018-11-26T21:54:28+5:30
शहरातील तीन प्रमुख चौकांच्या नामकरणासाठी नगपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. देशपातळीवरून सुरू झालेले नामकरणाचे लोण यवतमाळ शहरातही पोहोचल्याचे दिसून येते. याशिवाय आठ विषयांवर सभेत चर्चा होणार आहे.

तीन चौकांच्या नामकरणाचा प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील तीन प्रमुख चौकांच्या नामकरणासाठी नगपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. देशपातळीवरून सुरू झालेले नामकरणाचे लोण यवतमाळ शहरातही पोहोचल्याचे दिसून येते. याशिवाय आठ विषयांवर सभेत चर्चा होणार आहे.
बस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेला संविधान चौक असे नाव, बालाजी मंगल कार्यालयाजवळच्या चौकाला छत्रपती चौक नाव, धामणगाव रोडवरील पिंपळगाव चौकाला श्री अग्रसेन चौक नाव देण्याच्या प्रस्तावावर सभेत चर्चा होणार आहे.
नगरपरिषदेला हागणदारीमुक्त अभियानामध्ये तीन वेळा प्लस असल्याचा दर्जा मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत शहर कचरामुक्तीसाठी रेटींग ठरविण्यात येणार आहे. अमृत योजनेतून शहरातील भूमिगत गटारी योजनेच्या कामाची निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने बोलविल्या आहेत. त्यातील प्राप्त निविदेस सभेत मान्यतेसाठी ठेवले जाणार आहे. शहरात नव्याने आलेल्या भागातील आदिवासी बांधवांकरिता विकासनिधी मागविण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीत शहरातील स्वच्छतेच्या मुद्यावरून घमासान होण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक घंटागाड्या आॅगस्ट महिन्यापासून उभ्या आहेत. याच्या कंत्राटाबाबतही निर्णय झालेला नाही. यावरही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
भूमिगत गटार योजनेची निविदा
शहरात अमृत योजनेतून पहिल्या टप्प्यातील दोनशे कोटींच्या भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. यासाठी जीवन प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया केली आहे. आता या निविदांना मंजुरीसाठी पालिका सभागृहात ठेवले जाणार आहे. आधीच यवतमाळ शहराला विकास कामांची ‘रिअॅक्शन’ आली आहे. आता त्यात पुन्हा गटारी योजनेसाठी जीवन प्राधिकरणचे खोदकाम यवतमाळकरांना धडकी भरविणारे आहे. नेमकी ही योजना शहरासाठी उपयोगी आहे का यावरच मतमतांतरे आहेत.