कोट्यवधीची मालमत्ता मातीमोल
By Admin | Updated: June 29, 2015 00:19 IST2015-06-29T00:19:51+5:302015-06-29T00:19:51+5:30
सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुविधा मिळाव्या म्हणून शासनाने लाखो रूपये खर्च करून इमारती बांधल्या.

कोट्यवधीची मालमत्ता मातीमोल
सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुविधा मिळाव्या म्हणून शासनाने लाखो रूपये खर्च करून इमारती बांधल्या. आज या इमारतीची आणि जागेची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. असे असले तरी या मोक्याच्या जागेवर असलेल्या शासकीय इमारती खंडर झाल्या आहेत. जिल्हा मुख्यालयी अशा एक दोन नव्हे तर १० इमारती आहेत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामधील काही इमारती सुस्थितीत आहेत. तर काही इमारती अखेरच्या घटका मोजताहेत.
जनसामान्याला सेवा पुरविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहे. त्यातून सरकारी जागेवर विविध इमारती उभ्या झाल्या आहेत. विशिष्ट कालावधी नंतर इमारतीची जागा अपुरी पडते म्हणून नव्याने दुसरी इमारत बांधण्यात आली. परंतु जुन्या इमारतीचा कुठलाही उपयोग करण्यात आला नाही. या ठिकाणी मोठे कुलूप ठोकले गेले. वर्षानुवर्ष या इमारतीकडे कुणी फिरकले नाही. याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. या ठिकाणची दारे, खिडक्या, ग्रील, फरशी, टिनपत्रे आणि कवेलू चोरून नेले. परिसरात काटेरी झुडपं वाढली आहेत. या जागेवर आता चोरट्यांनी ताबा मिळविला आहे. भरदिवसा या ठिकाणी जुगार अड्डे चालतात. रात्रीच्या वेळी दारूड्यांचा धुमाकूळ असतो. सध्या या परिसराचा वापर केवळ कचरा टाकण्यासाठी होत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यवतमाळच्या पूनम चौकामध्ये जुने स्त्री रूग्णालय होते. साधारणत: एक एकरापेक्षाही अधिक जागेत त्याचे बांधकाम करण्यात आले होते. शासनाला ही जागा दान स्वरूपात मिळाली आहे. याचा वापर केवळ वैद्यकीय सेवांसाठी करण्यात यावा. अन्यथा ही जागा मूळ मालकाला परत जाईल असा हा करार आहे. यामुळे स्त्री रूग्णालयाचे स्थानांतरण झाल्यानंतर ही जागा खितपत पडली. मात्र त्याचा नव्याने वापर करण्यासाठी शल्य चिकित्सक अथवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कुठल्याही उपाययोजना प्रशासनाला सूचविल्या नाही. यातुन कोट्यवधी रूपयांची जागा बेवारस झाली आहे. येथे लाखो रूपये खर्च करून उभारलेली इमारत खंडर झाली आहे.
नगरपरिषदेच्या इमारती लगत जुनी दुमजली इमारत आहे. सर्व कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थानांतरित झाले. मात्र जुन्या इमारतीचा वरचा मजला बंद अवस्थेत पडला आहे. आजपर्यंत त्याचा कुठलाही वापर नगर परिषदेने केला नाही. ही इमारत सुस्थितीत असली तरी अडगळीची ठरत आहे. दत्त चौकातील मुख्य मार्गावर असलेले टीबी रुग्णालय विस्तीर्ण जागेत व्यापाले आहे. टीबी रुग्णालय परिसरात कर्मचारी वसाहत आणि शासकीय कार्यालय आहेत. यातील टीबी रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात स्थानांतरित झाले आहे. ही इमारत सुस्थित आहे, असे असलेतरी या जागेसह इमारतीचा कुठलाही उपयोग केला जात नाही. यवतमाळ ते गोदनी मार्गावर उद्योग भवनाची इमारत होती. ही जागा अपुरी पडते म्हणून येथील कार्यालय दारव्हा मार्गावर उद्योगभवनमध्ये स्थानांतरित झाले.
जुनी इमारत आज तशीच पडून आहे. वाघापूर मार्गावर कृत्रिम रेतन केंद्राची इमारत, कृषी विज्ञान केंद्रा लगतच्या कुकु टपालन केंद्राची अवस्था अशीच बिकट झाली आहे. या ठिकाणची कर्मचारी वसाहत मोडकळीस आले आहेत. या सर्व ठिकाणी दारूडे, चोरटे आणि जुगाऱ्यांचा वावर असतो.