अडथळे पार करत साधली प्रगती
By Admin | Updated: October 5, 2015 02:34 IST2015-10-05T02:34:59+5:302015-10-05T02:34:59+5:30
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारी संस्था आहे

अडथळे पार करत साधली प्रगती
अभिषेक ठाकरे : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा
घाटंजी : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारी संस्था आहे. अनेक अडथळे, अडचणी आल्या, पण पारदर्शकतेच्या बळावर मात करून विजय मिळविला. कुठलेही कर्ज नसणारी आणि २.८० कोटी शिल्लक ठेवणारी ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, अशी माहिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी सभेत दिली.
संस्थेने शेतमाल तारण योजना आणि एक कोटींचा चढ-उतार ठेवला आहे. एसएमएस सेवा सुरू करून दररोज एक हजार शेतकऱ्यांना बाजारभाव कळविला जातो. अंतिम मंजूरीनंतर धान्य यार्डवर १.२० कोटींच्या बांधकामाचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अत्याधुनिक सेवा पुरविण्याचा प्रयत्न आहे. सीसीआयची कापूस खरेदी याहीवर्षी सुरू राहील, हा प्रयत्न आहे. त्यामुळे कापसाला योग्य भाव मिळेल, असे अभिषेक ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी मंचावर माजी मंत्री शिवाजीराव मोघे, पणन महासंघाचे संचालक अण्णासाहेब पारवेकर, उपसभापती प्रकाश डंभारे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश लोणकर, शंकरराव ठाकरे, रमेश लोणकर, संजय इंगळे आदी उपस्थित होते.
शिवाजीराव मोघे यांनी लोअर पैनगंगा धरणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. लोणकर यांनी शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती मांडून कर्ज माफीची मागणी केली. पारवेकर यांनी आमचे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जे-जे करता येईल ते-ते मुद्दे मुख्यमंत्र्यांपुढे रेटून धरले जाईल, असे सांगितले. या सभेमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शिवाय संस्थेचा विकास आणखी कसा करता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी ज्येष्ठ सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)