१४ गावांत वीज समस्या अद्याप कायमच
By Admin | Updated: June 19, 2015 02:13 IST2015-06-19T02:13:34+5:302015-06-19T02:13:34+5:30
मारेगाव फिडरवरील परिसरातील १४ गावांत वीज समस्या निर्माण झाली आहे. रात्रभर वीजपुरवठा खंडित राहात असल्याने ग्रामीण भागातील जनता कमालीची त्रस्त झाली आहे.

१४ गावांत वीज समस्या अद्याप कायमच
महावितरण उदासीन : ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष, उकणी, पाटणबोरी, झरी परिसरातील ग्राहक वैतागले
उकणी : मारेगाव फिडरवरील परिसरातील १४ गावांत वीज समस्या निर्माण झाली आहे. रात्रभर वीजपुरवठा खंडित राहात असल्याने ग्रामीण भागातील जनता कमालीची त्रस्त झाली आहे.
मारेगाव फिडरवर निळापूर, ब्राम्हणी, कोल्हेरा, पिंपरी, अहेरी, बोरगाव, पिंपळगाव, जुनाडा, उकणी, भालर, लाठी, सावर्ला, बेसा, निवली आदी गावे येतात. तेथूनच या गावांना वीज पुरवठा केला जातो. या सर्वच गावांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. या फिडरसाठी एकच वायरमन असल्याने अडचण निर्माण झाली आहे. वारा आला, की वीज गुल होणे, पावसाच्या दिवसात दोन-दोन दिवस वीज न राहणे, हे प्रकार आता नित्याचेच झाले आहे.
या प्रकारामुळे संबंधित कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याचबरोबर अनेक खांब आता जीर्ण झाले असून ते पडण्याच्या अवस्थेत आहे. त्याच्या दुरूस्तीकडे महावितरणचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात जिवीतहानी होण्याची शक्यताही बळावली आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात डासांचाही उपद्रव वाढला आहे. वीज राहात नसल्याने ग्रामस्थांना डासांचाही त्रास सहन करावा लागत आहे.
एखाद्या ग्राहकांकडे एका महिन्याचे देयक थकले, तर महावितरणचे कर्मचारी लगेच मीटर काढून नेतात. तेवढे काम महावितरणकडून चपळाईने केले जाते. मात्र ग्राहकांच्या समस्या सोडविण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मारेगाव फिडरवील १४ गावातील वीज समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
पाटणबोरीत केवळ १० तास वीजपुरवठा
पाटणबोरी : येथील विद्युत कंपनीतर्फे विजेचा खेळखंडोबा सुरू असून रात्रंदिवस होणाऱ्या लपंडावामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. या परिसरात दिवसातून केवळ १० तासच वीज पुरवठा केला जातो.
येथे कनिष्ठ उपअभियंता महिला असून त्यांचे दर्शन दुर्लभ झाल्याने ग्राहकांना आपल्या समस्या सोडविण्याकरिता पांढरकवडा येथे जावे लागते. त्यामुळे पैसा व वेळेचा अपव्यय होतो. विद्यार्थ्यांवर प्रमाणपत्रांपासून वंचित राहण्याची वेळ येते. वीज पुरवठा सुरळीत नसल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावरही होतो. नागरिकांना हातपंप व विहिरीवरून पाणी आणावे लागते. निर्ढावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्राहकांचे काहीच देणे-घेणे नाही. मे महिन्याचे मेन्टेनन्सचे काम येथील कर्मचारी जून महिन्यात करीत आहे. पावसाळ्याची सुरूवात झाल्याने वाऱ्याची झुळूक आली, की वीज गुल होते. येथील केंद्रामधील आॅपरेटर फोन उचलत नाही. कित्येकदा आॅपरेटर १००-२०० देऊन भाडोत्री माणूस ठेऊन खासगी कामे करून देतो. रात्री बिघाड झाल्यास कर्मचारी तो कधीही दुरूस्त करीत नाही. विशेष म्हणजे येथील कर्मचाऱ्यांना खांबावरही चढता येत नाही. या संदर्भात महावितरणकडे विचारणा केली असता, कधी बिघाड सापडत नाही, तर कधी मेन्टेनन्स, कधी रोहित्र जळाल्याचे थातुरमातूर कारण सांगण्यात येते. वीज पुरवठ्याबाबत गंभीर नसणारी महावितरण रिडींग कमी असूनही अधिक रिडींगचे देयक देण्यास तत्पर असते. अभियंत्याला स्वतंत्र क्वॉर्टर असून ते तेथे राहात नाही. पांढरकवडा येथून अपडाऊन करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर वचक उरला नाही. कर्मचारी नेहमी हॉटेल व ढाब्यावरच दृष्टीस पडतात. कार्यकारी अभियंत्यांनी कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून समस्येचे निराकरण करावे, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)