आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासन योजनात प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2015 00:31 IST2015-06-23T00:31:28+5:302015-06-23T00:31:28+5:30
परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतली.

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासन योजनात प्राधान्य
भेट घेऊन सांत्वन : परिवहन मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
यवतमाळ : परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासोबतच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ
देण्याची सूचना यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनुप खांडे, प्रवीण पांडे आदी उपस्थित होते.
पिंपरी (बुटी) येथील शांता प्रल्हाद ताजणे या महिलेने आत्महत्या केली होती. त्यांची मुले अमोल, मोहन, साधना यांच्याशी ना.रावते आणि ना.राठोड यांनी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. घाटाना (लोणी) येथील बाबुलाल राठोड यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचा मुलगा मनोज राठोड यांच्याशी संवाद साधला. घाटंजी तालुक्यातील घाटी येथील शेतकरी संतोष पांडे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली. केळापूर तालुक्याच्या घोडधरा येथे माधव गुलाबराव गोडे या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. या शेतकऱ्याचे खरडीचे पैसे उशिरा प्राप्त झाल्याने संबंधितांची चौकशी करून कार्यवाही करण्याची सूचना ना.रावते यांनी यावेळी केली. डोंगरखर्डा येथील राजू रामनाथ मुंगले या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेण्यात आली. यावेळी सदर गावातील नागरिकांनी मॉक्रोफायनांस तसेच दारिद्र्यरेषेचे कार्ड आणि राशनकार्डबाबत तक्रारी केल्या. दारिद्र्य रेषेचे कार्ड आणि रेशनकार्डच्या याद्या तपासून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचा प्रस्ताव
सादर करण्याचे ना. रावते यांनी सुचविले.
घाटाना येथे काही शेतकऱ्यांना सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले असतानासुध्दा अशा जमिनीच्या खरेदीचे व्यवहार झाल्याने याप्रकरणी चौकशीचे आदेशही ना.रावते यांनी यावेळी प्रशासनास दिले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांशी चर्चा करताना त्यांचे दु:ख, अडीअडचणी दोन्ही मंत्र्यांनी समजून घेतल्या. या कुटुंबांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासोबतच त्यांच्या अडचणी सोडविण्याची सूचना यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे. असा विश्वास यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)