पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘प्रहार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:25 IST2018-05-28T22:25:32+5:302018-05-28T22:25:54+5:30
शहरातील भीषण पाणीटंचाई आणि तुरीच्या रखडलेल्या चुकाºयाचा प्रश्न घेऊन प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडक दिली. मात्र पोलिसांनी मोर्चा दत्त चौकातच रोखल्याने मोर्चेकऱ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.

पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘प्रहार’
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील भीषण पाणीटंचाई आणि तुरीच्या रखडलेल्या चुकाऱ्याचा प्रश्न घेऊन प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडक दिली. मात्र पोलिसांनी मोर्चा दत्त चौकातच रोखल्याने मोर्चेकऱ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.
यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिक पाण्यासाठी व्याकूळ झाले आहे. पाण्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जिल्ह्याती नाफेडचे शासकीय तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले. तसेच तुरीचे चुकारेही रखडले आहे. यामुळे पेरणीचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. या प्रश्नासंदर्भात जाब विचारण्यासाठी प्रहारच्यावतीने आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चाला दत्त चौकातच पोलिसांनी अडविला. त्यामुळे आंदोलनकर्ते संतप्त झाले. पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना त्याच ठिकाणी स्थानबद्ध केले. त्यामुळे निवेदनही देता आले नाही. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे राज्य संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांनी केले. यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख नितीन मिर्झापुरे, हंसराज सोमवंशी, तुषार भोयर, आशिष तुपटकर, रूपेश चरडे, गोपाल चव्हाण, रणजित जुमळे, नरेश भोयर, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते. या आंदोलनामुळे दत्त चौकात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
कडेकोट बंदोबस्त
यवतमाळ शहरातील पाण्याचा प्रश्न २६ मेपर्यंत सुटला नाही तर पालकमंत्र्यांच्या घरापुढे आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिला होता. यवतमाळ शहरातील पाणीटंचाई तर सुटली नाही, उलट पाण्याचा प्रश्न गंभीर होत गेला. आमदार बच्चू कडू यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारी प्रहारचे कार्यकर्ते पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा घेऊन धडकले. परंतु पोलिसांनी यापूर्वीच निवासस्थान परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला होता. हा मोर्चा दत्त चौकातच अडविला.