खांबावरील वीज तारा झाल्या कालबाह्य
By Admin | Updated: June 27, 2015 00:32 IST2015-06-27T00:32:27+5:302015-06-27T00:32:27+5:30
शहरासह तालुक्यातील वीज खांबांवरील तारा कालबाह्य झाल्या असून, लोंबकाळणाऱ्या वीज तारा कधीही तुटून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

खांबावरील वीज तारा झाल्या कालबाह्य
जीव धोक्यात : वीज वितरणचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष
उमरखेड : शहरासह तालुक्यातील वीज खांबांवरील तारा कालबाह्य झाल्या असून, लोंबकाळणाऱ्या वीज तारा कधीही तुटून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. वीज तारांना लावलेले गार्डींगही आता दिसेनासे झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. मात्र वीज वितरण कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
शहरातील वीज खांब आणि त्यावरील तारांचे वयोमान ६० वर्ष झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी वीज तारा लोंबकळत आहे. साधा वारा आला तरी तारांमध्ये घर्षण होऊन ठिणक्या पडतात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने चक्क वीज खांबातच प्रवाह संचारल्याने दोन शेळ््या दगावल्या, शेळीमालक थोडक्यात बचावला. असे प्रकार ठिकठिकाणी पुढे येत आहेत. याबाबत नगरपरिषदेने वीज वितरण कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु वीज मंडळाने कोणतीही कारवाई केली नाही. शहरातील हजारो नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात आला आहे.
अशीच अवस्था ग्रामीण भागातील वीज वितरण कंपनीची आहे. वीज तारा लावण्यात आल्या तेव्हापासून देखभाल दुरुस्तीच झाली नाही.
गावातील वीज पुरवठाही यामुळे खंडीत होतो. न्युट्रल नसलेल्या जागेवर गार्डींग न्युट्रल वापरून त्यासुद्धा तुटून रस्त्यावर पडत आहेत. काही ठिकाणी तारा तर नागरिकांच्या घरावर टेकल्या आहेत. परंतु या प्रकरणाकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. सध्या पावसाळ््याचे दिवस आहे. अशा स्थितीत एखादा मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहे. वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
घरावरून गेलेल्या वीज तारा जीवघेण्या
उमरखेड शहरात अनेक घरांवरील वीज तारा गेल्या आहेत. या वीज तारा घराला स्पर्श करतात की काय असे वाटते. वादळी वाऱ्यात घर्षणामुळे ठिणग्या पडतात तेव्हा या घरातील मंडळी जीव मुठीत घेऊन राहतात. तसेच अनेक ठिकाणी मोठ्ठाले वृक्ष वाढले असून फांद्यांमध्ये तार अडकून अपघात होण्याची भीती असते. घरावरील वीज तारांबाबत तातडीने उपाययोजनेची मागणी होत आहे.
उमरखेड शहर अतिशय जुने आहे. त्यामुळे येथील वीज ताराही खूप वर्षापूर्वी टाकलेल्या आहे. सध्या तीन किलोमीटर लांबीच्या वीज तारांचे नूतणीकरण करण्यात आले असून ११० नवीन खांब टाकले आहे. शहराचे काम खासगी एजंसीला दिले असून त्यांच्याकडून काम सुरू आहे. परंतु मागणी प्रमाणे साहित्य उपलब्ध होत नाही. साहित्य उपलब्ध झाले की कामाला सुरुवात होईल.
- एस.बी. कोंडे,
सहायक अभियंता वीज वितरण उमरखेड शहर