वीज कंपनीच्या गलथान कारभाराने शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: August 29, 2014 00:08 IST2014-08-29T00:08:14+5:302014-08-29T00:08:14+5:30
वीज कंपनीच्या वडकी केंद्रांतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात बोगस कारभार सुरू असून याचा फटका परिसरातील शेतकरी व नागरिकांना बसत आहे. वडकी अंतर्गत अनेक गावे येतात. या गावांमध्ये शेतकरी, शेतमजूरांची

वीज कंपनीच्या गलथान कारभाराने शेतकरी त्रस्त
मंगेश चवरडोल - किन्ही(जवादे)
वीज कंपनीच्या वडकी केंद्रांतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात बोगस कारभार सुरू असून याचा फटका परिसरातील शेतकरी व नागरिकांना बसत आहे. वडकी अंतर्गत अनेक गावे येतात. या गावांमध्ये शेतकरी, शेतमजूरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी मोटरपंप व विहीर या दोनही बाबी असताना वीज पुरवठाच नसल्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे.
परिसरातील गावांमध्ये वडकी वीज केंद्रावरून विद्युत पुरवठा पुरविण्यात आला आहे. परंतु २४ तासात १०० पेक्षा अधिकवेळा विजेची ये-जा सुरू असते.
सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, व्यापारी सर्वच त्रस्त झाले आहेत. याबाबत वीज कंपनीच्या कार्यालयावर गावकरी तक्रारीसाठी वारंवार गेले असता तेथे कुणीही जबाबदार अभियंता कधीच उपलब्ध नसतो.
अभियंता ताजने यांना त्यांच्या कार्यालयातूनच मोबाईलवर संपर्क करावा लागतो. त्यानंतर त्यांनी फोनवरच सांगितले की, मी वडकी कार्यालयाचा कायमस्वरूपी अभियंता नसून माझ्याकडे केवळ प्रभार आहे. तुम्ही कार्यालयात येवून नंतर भेटा. त्यांनी सांगितलेल्या तारखेवर कार्यालयात भेटावयास गेल्यास त्यादिवशी ते मात्र भेटत नाहीत. संबंधित किन्ही गावातील लाईनमनला फोन केल्यास आठ-आठ दिवसात लाईनमन बदलत असतात. त्यामुळे नेमका कुणाशी संपर्क साधावा, हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. वडकी सर्कलमधील वीज कंपनीचे लाईनमन हे वडकीवरूनच संपूर्ण गावे पाहण्याचा प्रयत्न करतात.
गावातील कोणत्याही खासगी व्यक्तीला फेज टाकण्यासाठी व वायर जोडण्यासाठी पाठवितात. यामुळे अपघाताची शक्यता फेटाळता येत नाही. गावागावातील डीपी फुटलेल्या आहे.
अशा परिस्थितीत कुण्याही खासगी व्यक्तीकडून कामे करून घेणे म्हणजे मोठा धोका आहे. येथील वीज कंपनी कार्यालयाला कायमस्वरूपी अभियंता देण्यात यावा व प्रत्येक गावातील लाईनमनने आपली कामे स्वत: करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.