राजकीय ‘चाय’ ठरला दाभडीच्या जखमेवर मीठ

By Admin | Updated: June 25, 2016 02:37 IST2016-06-25T02:37:00+5:302016-06-25T02:37:00+5:30

निसर्गाची वारंवार अवकृपा झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहे. अशावेळी दाभडी गावाच्या...

Political 'tea' became salt on the scalp | राजकीय ‘चाय’ ठरला दाभडीच्या जखमेवर मीठ

राजकीय ‘चाय’ ठरला दाभडीच्या जखमेवर मीठ

शेतकरी वंचित : भाजप आणि काँग्रेसच्या भूमिकांवर प्रश्न
राजेश कुशवाह आर्णी
निसर्गाची वारंवार अवकृपा झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहे. अशावेळी दाभडी गावाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांतर्फे चहाचे राजकारण केले जात आहे. भाजपने घेतलेला ‘चाय पे चर्चा’ आणि काँग्रेसतर्फे झालेला ‘चाय की चर्चा’ हे दोन्ही कार्यक्रम केवळ देखावे ठरले असून राजकीय पक्षांनी दाभडीच्या जखमेवर मीठ चोळून आपली पोळी भाजून घेतली आहे.
जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर प्रसिद्धी पावलेल्या ओंकारेश्वर मंदिरामुळे दाभडी गाव संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. आर्णी शहरापासून हाकेच्या अंतरावर हे गाव वसले असून जवळपास अडीच हजार लोकवस्ती आहे. नापिकीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे कधी काळी हे गाव प्रकाशझोतात आले होते. दारू, मटका, जुगार अशा समाजविघातक प्रकारांमुळे ग्रामस्थसुद्धा हतबल झाले होते. पण येथे तलाठी म्हणून रुजू झालेले श्याम रणनवरे यांनी गावाला विकासाची दिशा दिली. त्यांच्या प्रयत्नातून दारू हद्दपार झाली. जुगार थांबला आणि गावातही स्वच्छता आली. त्यामुळे पुन्हा एकदा दाभडी गाव प्रकाशझोतात आले.
अशा प्रकारे प्रकाशझोतात आलेल्या दाभडी गावाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमासाठी निवड केली. चाय पे चर्चाच्या निमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांशी नरेंद्र मोदी यांनी दिलखुलास संवाद साधला होता. कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून हा आॅनलाईन संवाद पार पडला. सुंदर विवेचन करीत नरेंद्र मोदी यांनी मीच खरा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून हजारो लोकांना भुरळ घातली. हीच बाब आर्णी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसला मारक ठरली होती. राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांना भाजपच्या नवख्या प्रा.राजू तोडसाम यांनी घरी बसविले. मोदींचे प्रभावी नेतृत्व, वक्तृत्व व प्रामाणिक वाटणाऱ्या आश्वासनांमुळे केवळ दाभडीवासीयांचेच नव्हे तर उपस्थित हजारो लोकांचे लक्ष वेधून घेण्यात भाजप यशस्वी झाले. मोदींचे तब्बल पाच तासांचे दाभडीतील वास्तव्य लोकांना आश्वासक वाटले. आता आपले भले होणार, ही भाबडी आशा मात्र हळूहळू फोल ठरू लागली. कधी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर खासदार दत्तक ग्राम म्हणून दाभडीला दत्तक घेणार, अशी चर्चा पसरते तर कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाभडीच्या विकासाचा ५० कोटींचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देतात. पण दाभडी गावाला फुटकी कवडीदेखील मिळालेली नाही.
हीच बाब काँग्रेस पक्षाने हेरली. काँग्रेसच्या नेतृत्वाने ‘चाय पे चर्चा’ला प्रत्युत्तर देण्यासाठी दाभडीमध्ये चाय की चर्चा कार्यक्रम घेतला. एक वर्षापूर्वीच काँग्रेसने ओंकारेश्वराच्या मंदिरात काळा चहा पिवून भाजप शासनाचा निषेध केला. पुन्हा १६ जून २०१६ रोजी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काळा चहा पिवून निषेध केला. आठवड्यापूर्वी झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात देशातील व राज्यातील दिग्गज नेतेमंडळींसोबत खासदार राज बब्बरसारख्या सिमेकलावंतसुद्धा उपस्थित होता. अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. मात्र जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाने फारसा उत्साह दाखविल्याचे दिसले नाही. बैलबंडीतून कलाकार व नेतेमंडळींचे आगमन, लाखो रुपयांचा खर्च व चोख पोलीस बंदोबस्त असा हा सोहळा झाला. आर्णी व दाभडीच्या रस्त्यावरील एका मोठ्या जिनिंगमध्ये चाय की चर्चा घडवून आणली. देशातील व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढत आम्हीच शेतकऱ्यांचे खरे वाली आहोत, असा एकमुखी पोवाडा काँग्रेसने गायला. कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले होते. पण राज बब्बर यांच्या भाषणानंतर आमदार माणिकराव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होताच अनेकांनी काढता पाय घेतला. अर्थात तब्बल तीन तासांच्या बैठकीमुळे त्रासलेले व केवळ राज बब्बर यांना पाहण्यासाठी जमलेले काँग्रेसेत्तर लोकच उठले होते.
दाभडीच्या नावावर सुरू असलेले भाजप आणि काँग्रेसचे हे राजकारण मात्र केवळ दाभडीच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरत आहे. शेती आणि शेतमजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या दाभडीसारख्या गावाला आतापर्यंत काहीच न मिळणे, ही बाब खटकणारी आहे. शेतमालाला भाव नाही, खरडीचे, अतिवृष्टीचे पैसे अद्याप मिळाले नाही. विमा कंपनीने तर शेतकऱ्यांची थट्टाच सुरू केली आहे. शासनाचा कोणताही उपक्रम शेतकऱ्यांना धीर देणारा ठरत नाही. अखेर भाजप व काँग्रेसच्या या राजकारणामुळे शेतकऱ्यांना काय लाभ, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न दोन वर्षानंतरही ‘जैसे थे’
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी दाभडीत येऊन अनेक आश्वासने दिली. ‘चाय पे चर्चा’ करता-करता ते म्हणाले होते की, कापसाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा गृहित धरून भाव देऊ. पण त्यांचे सरकार येऊन कापसाचे दोन हंगाम येऊन गेले तरी या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्याचवेळी मोदी सरकारवर शरसंधान साधण्यासाठी काँग्रेसनेही ‘चाय की चर्चा’ तापवण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलनाला जनाधाराची आग कमी पडली आणि चर्चा ऊतू जाण्यापूर्वीच थंडावली. दोन्ही पक्षांकडून दाभडीचा केवळ राजकीय हेतूपोटी वापर झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Political 'tea' became salt on the scalp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.