अन्यायग्रस्त महिलेने मागितले पोलीस संरक्षण
By Admin | Updated: August 1, 2015 03:44 IST2015-08-01T03:44:35+5:302015-08-01T03:44:35+5:30
गावातील काही लोकांकडून होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी, या मागणीचे निवेदन ब्राह्मणवाडा (ता.आर्णी) येथील एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

अन्यायग्रस्त महिलेने मागितले पोलीस संरक्षण
यवतमाळ : गावातील काही लोकांकडून होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी, या मागणीचे निवेदन ब्राह्मणवाडा (ता.आर्णी) येथील एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे. आधी मुलीवर अत्याचार झाला, आता आम्हाला गावातून हाकलून लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून वासुदेव दौलत राठोड, नंन्हू दौलत राठोड, प्रेमदास नरसिंग पवार, चंद्रभागाबाई अविनाश राठोड, राजेंद्र नन्हू राठोड यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी दिली जाते. यापूर्वी आपल्यासह पतीला मारहाण झाली. शिवाय जातीवाचक शिवीगाळही करण्यात आली.
आठवडाभराच्या आत गावातून निघून न गेल्यास जीवानिशी ठार करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे सदर लोकांवर कारवाई करून संरक्षण द्यावे, अशी मागणी या महिलेने निवेदनातून केली आहे. गावात दहशतीखाली राहावे लागत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा सदर महिलेने व्यक्त केली आहे. (वार्ताहर)