मोबाईल, तीन युवकांवर पोलीस तपास केंद्रित
By Admin | Updated: September 13, 2014 00:26 IST2014-09-13T00:26:25+5:302014-09-13T00:26:25+5:30
माहूरच्या रामगड किल्ल्यातील शाहरुख व निलोफर या युगुलाच्या हत्येमागील रहस्य ४८ तासानंतरही उलगडू शकलेले नाही.

मोबाईल, तीन युवकांवर पोलीस तपास केंद्रित
उमरखेड (कुपटी) : माहूरच्या रामगड किल्ल्यातील शाहरुख व निलोफर या युगुलाच्या हत्येमागील रहस्य ४८ तासानंतरही उलगडू शकलेले नाही. दरम्यान पोलिसांनी शाहरुखच्या वाहनात आढळलेला मोबाईल आणि त्यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात तीन युवकांवर आपला तपास केंद्रित केला आहे.
पुसद येथील अभियांत्रिकीचे विद्यार्थी शाहरुख खान फिरोज खान पठाण (२३) रा. जाकीरहुसेन वार्ड उमरखेड आणि निलोफर मारिया खालीद बेग मिर्झा (२०) रा. दुधे ले-आऊट गांधीनगर पुसद या दोघांची १० सप्टेंबरला माहूरच्या किल्ल्यात गळा चिरुन हत्या करण्यात आली. या हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. दोनही कुटुंबियांनीसुद्धा पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केली नाही की संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळेच घटनेवरून दोन दिवस लोटूनही खुनामागील रहस्य कायम आहे. नेमका खून कुणी आणि कशासाठी केला असावा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. पोलीसही अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचले नसून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे. अद्याप पोलिसांच्या तपासाची ठोस दिशा निश्चित झाली नाही. दरम्यान शाहरुखच्या गाडीत त्याचा मोबाईल पोलिसांना आढळून आला. त्याद्वारे काही सुगावा मिळतो का या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. घटनेच्यावेळी शाहरुख व निलोफर या दोघांच्या मागे तीन जण जंगलात गेल्याचे सांगितले जाते. हे तीन जण नेमके कोण, स्थानिक की बाहेरचे, यावर माहूर पोलिसांनी तूर्त लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान या तपासाच्या अनुषंगाने पुसद, उमरखेडसह अन्य भागात पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा फार उपयोग होऊ शकला नाही. पोलीस पथकांनी वारंवार घटनास्थळी भेटी देऊन काही सुगावा लागतो का याचा शोध घेतला. मात्र तेथे तपासाला दिशा देणारे काहीही मिळून न आल्याने मारेकरी शातीर असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. शाहरुख व निलोफरच्या हत्येने पुसदच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्या दोघांचाही मित्र परिवार या घटनेने सुन्न झाला आहे. अभ्यासात हुशार असलेले, कुणालाही मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या शाहरुख व निलोफरच्या अशा जाण्याने त्यांच्या मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया हे या प्रकरणाच्या तपासावर जातीने लक्ष देऊन आहे. (वार्ताहर )