पोलिसांचा वचक झाला कमी

By Admin | Updated: May 23, 2014 00:16 IST2014-05-23T00:16:27+5:302014-05-23T00:16:27+5:30

वणी उपविभागातील पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला असून उपविभागात अवैध व्यवसायांनी चांगलेच तोंड वर काढले आहे. पोलिसांची पकड ढिली झाल्याने गेल्या

The police became less scared | पोलिसांचा वचक झाला कमी

पोलिसांचा वचक झाला कमी

वणी : वणी उपविभागातील पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला असून उपविभागात अवैध व्यवसायांनी चांगलेच तोंड वर काढले आहे. पोलिसांची पकड ढिली झाल्याने गेल्या काही दिवसांपासून अवैध व्यावसायीक चांगलेच निर्ढावले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आता जिल्हास्तरीय पोलीस पथकांना धाव घ्यावी लागत आहे. आपल्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे. त्यासाठी वणी उपविभागात वणी, मुकुटबन, शिरपूर, मारेगाव व पाटण येथे पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. त्यांना मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले. सर्वच ठाण्यांमधील अधिकारी, कर्मचार्‍यांना त्यांच्या कामांची विभागणी करून देण्यात आली आहे. प्रत्येक ठाण्यात डी.बी., गोपनीय, वाहतूक शाखा आहेत. या शाखांमध्ये आवश्यक कर्मचारी व अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहे. तथापि या शाखांवर वचक ठेवणारे अधिकारीच बिचकून असल्याने वणीसह, मारेगाव, पाटण, झरी, शिरपूर, मुकुटबन, कायर आदी ठिकाणी मटक्यांचे ठिय्ये तयार झाले आहेत. तेथे चौकांत, पानटपर्‍यांवर मटक्याच्या पट्ट्या फाडल्या जात असल्याचे चित्र नागरिकांना दिसत आहे. वणी उपविभागात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने जुगारही सुरू आहे. उपविभागात अद्याप काही ठिकाणी छुप्या पद्धतीने कोंबडबाजारही सुरू असल्याची पक्की माहिती आहे. जनतेला याबाबत माहिती मिळते. मात्र ती पोलिसांना का मिळत नाही, हा प्रश्न आहे. उपविभागात अनेक ठिकाणी अवैध दारूही विकली जात आहे. या अवैध व्यवसायाची सर्व माहिती १०० किलोमीटर अंतरावरील जिल्हा पोलिसांना मिळते. त्या माहितीवरून विशेष पथके सापळा रचून मटका, जुगार व दारू अड्ड्यांवर छापा घालून आपली कामगिरी फत्ते करतात. मात्र स्थानिक पोलिसांना त्याबाबत माहिती का मिळत नाही, असा प्रश्न निर्माण होतो. ‘अर्थपूर्ण’ संबंधापोटी या सर्व अवैध व्यवसायांना उपविभागातील पोलीस प्रशासनाचीच मूकसंमती तर नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांत जिल्हा पोलिसांनी या परिसरात छापे टाकून मटका, आयपील जुगाराचा पर्दाफाश केला. वणीत जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड मारली. त्यातून हजारो रुपयांची रक्कम साहित्य जप्त केले. त्यानतंर कुठे स्थानिक पोलिसांना जाग आली. त्यांनीही नंतर धाड मारून आपले अस्तित्व दर्शविले. वणी उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांमधील डी.बी. पथकाचा दराराही कमी झाला आहे. पोलिसांना सध्या बदल्यांचे वेध लागले आहे. त्यात डी.बी पथकातील अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांची कामगिरीही थंडावली आहे. महिना-दोन महिन्यात बदलून जायचेच आहे, तर नस्ती कुणासोबत का दुश्मनी घ्यायची, असा त्यांचा कल आहे. अद्याप बदली आदेश प्राप्त झाले नाही. मात्र पुढील महिन्यात पोलिसांना बदली आदेश प्राप्त होण्याचे संकेत आहे. त्यामुळे पोलिसांचे कार्यच थंडावले आहे. उपविभागात चोरट्यांनी आत्तापर्यंत अनेक दुचाकी लंपास केल्या. तथापि अद्याप त्यांचा शोध घेणे डी.बी. पथकाला शक्य झाले नाही. काही महिन्यांपूर्वी एका संशयीत दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्याचे पुढे काय झाले कुणालाच कळले नाही. त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी मिळविणेही पोलिसांना शक्य झाले नाही. उपविभागातील काही ठाण्यांमध्ये तर नागरिकाची तक्रार दाखल न करून घेण्याचा पायंडा पडला आहे. कोणतीही केवळ तक्रार चौकशीत ठेवली जाते. एन.सी म्हणून प्रथम नोंद केली जाते. नंतर तिची पाहिजे ज्या पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, असा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे नागरिकही आता तक्रार करण्यास मागेपुढे बघतात. सर्वच पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेतील पोलीस तर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आहे, की दुसर्‍याच कामासाठी आहे, असा प्रश्न पडतो. नागरिकांची वाहने अडवून त्यांना दंड ठोकला जातो. मात्र अवैध प्रवासी वाहतूक त्यांना दिसत नाही. शहरासह ग्रामीण भागात आडवे-तिडवे धावणारे आॅटो नागरिकांना हैराण करून सोडतात. वाहनात कोंबड्याच्या खुराड्यात कोंबडे भरल्याप्रमाणे प्रवासी भरून वाहतूक केली जाते. ती पोलिसांना कदीच दिसत नाही. पोलीस प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे उपविभागातील नागरिकांची सुरक्षितताच वांद्यात सापडली आहे. झरी येथे तहसील, पंचायत समिती आदी कार्यालये आहेत. तेथे पोलीसही असतात. मात्र त्यांना अवैध प्रवासी वाहतूक दिसत नाही. मटका अड्डेही सापडत नाहीत. शिबला येथेही तोच प्रकार आहे. मुकुटबन, कायर, शिरपूर, शिंदोला, राजूर, मारेगाव, करणवाडी, कुंभा, पाटण, आदी गावे या उपविभागात मोठी आहेत. तेथे अवैध व्यवसायही सुरू आहेत, असे ग्रामस्थ सांगतात. मात्र त्याकडे पोलिसांचे लक्षच जात नाही. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The police became less scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.